देसाईगंजच्या अनेक वॉर्डांत पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:35 IST2021-05-16T04:35:47+5:302021-05-16T04:35:47+5:30
देसाईगंज शहराची लोकसंख्या ४० हजारांच्या घरात असून लोकसंख्येच्या प्रमाणात नळयोजना कार्यान्वित आहे. असे असताना ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत शहराच्या गांधी ...

देसाईगंजच्या अनेक वॉर्डांत पाणीटंचाई
देसाईगंज शहराची लोकसंख्या ४० हजारांच्या घरात असून लोकसंख्येच्या प्रमाणात नळयोजना कार्यान्वित आहे. असे असताना ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत शहराच्या गांधी वाॅर्डासह मधुबन काॅलनीत मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून पिण्यासाठीच पाणी नसल्याने इतर आवश्यक बाबींसाठी पाण्याअभावी तारांबळ उडू लागली आहे.
याबाबत स्थानिक नागरिकांनी नगर प्रशासनाशी संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहे. पाणीपुरवठा कशामुळे बंद करण्यात आला आहे व किती दिवस बंद राहील याबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
अशीच स्थिती शहराच्या अनेक वाॅर्डांत असून काही वाॅर्डांत नगर परिषदेमार्फत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत असून, तत्काळ पाणी उपलब्ध करून देण्यात न आल्यास नगर परिषदेवर घागर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.