दुष्काळातही पाण्याचा अपव्यय
By Admin | Updated: September 15, 2015 03:35 IST2015-09-15T03:35:57+5:302015-09-15T03:35:57+5:30
यावर्षी सरासरीपेक्षा ५० टक्क्याहून पाऊस कमी पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक भागातील विहिरी अजूनही

दुष्काळातही पाण्याचा अपव्यय
गडचिरोली : यावर्षी सरासरीपेक्षा ५० टक्क्याहून पाऊस कमी पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक भागातील विहिरी अजूनही तळ गाठूनच आहेत. अनेक गावांचे मालगुजारी तलावही भरलेले नाही. त्यामुळे नद्यांचे पात्र पाण्याऐवजी रेतीने भरलेले दिसतात. अशा परिस्थितीत पाणी जपून वापरावे लागणार आहे. नाहीतर यावर्षीच्या उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई भासणार आहे. अशी परिस्थिती असतानाही गडचिरोली, आरमोरी, अहेरी, चामोर्शी, वैरागड शहरासह अनेक भागात लोकमत चमूने सोमवारी पाहणी केली. या पाहणीत पाईपलाईनमध्ये असलेले लिकेज तसेच पाईपलाईनजवळ असलेले व्हॉल्व यामधून शेकडो लिटर पाणी दररोज वाया जात असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. मात्र या संदर्भात कुणालाही फारसे गांभिर्य नाही, असे दिसून येत आहे. जिल्हा मुख्यालयासह तालुका मुख्यालयात वाहन धुण्यासाठी नागरिक तसेच व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय करीत असल्याचे दिसून आले.
गाडी धुण्यासाठी हजारो लिटर पाणी वाया
४गडचिरोली शहरात वाहन धूवून देणारे चार ते पाच व्यावसायिक आहेत. तालुका मुख्यालयाच्या ठिकाणीही अशा दुकानांची एकूण संख्या २४ ते २५ च्या घरात आहे. दररोज विहीर, बोअरवेल, नळ यांचे पाणी वापरून वाहन धुण्याचे काम यांच्या माध्यमातून केले जाते. दिवसाला किमान गडचिरोली शहरात ५० ते ६० वाहने धुतले जातात. तालुका मुख्यालयात याची संख्या १० च्या घरात आहे. एक वाहन धुण्यासाठी साधारणत: १० मिनिटाचा कालावधी लागतो. वाहन धुण्यासाठी जवळजवळ दररोज दोन ते तीन हजार लिटर पाणी सहजपणे वाया जाते. याशिवाय अनेक नागरिक सकाळी नगर पालिका, नगर पंचायती व ग्रामपंचायतीचे नळ आल्यावर तसेच आपल्या खासगी पाणी साधनावरून वाहन घरीच धुतात. रस्त्यावर व नाल्यांमध्ये वाहन धुतल्याचे पाणी सोडून देतात. यामुळेही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे.
पोलीस ठाण्याजवळ गळती
गडचिरोली शहरातील शहर पोलीस ठाण्याजवळ व्हॉल्व बसविण्यात आला आहे. सदर व्हॉल्वमधून वर्षभर पाण्याची गळती होत राहते. या परिसरातील काही दुकानदार जाणूनबुजून व्हॉल्वमध्ये बिघाड निर्माण करून येथील पाणी आपल्या वापरासाठी घेतात. त्यामुळे त्यांना विनामुल्य पाणी उपलब्ध होतो. मात्र पाण्याचा दररोज मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. नगर पालिका प्रशासनाचे शहरातील या प्रकाराकडे दुर्लक्ष झाले आहे.
आरमोरीतही व्हॉल्वमधून गळती
४आरमोरी शहराला वैनगंगा नदीतून पाणी पुरवठा केला जातो. ब्रह्मपुरी-आरमोरी मार्गाच्या बाजुला ही पाईपलाईन टाकली आहे. या पाईपलाईनला व्हॉल्व देण्यात आला आहे. तो वर्षभर गळत राहतो. शेकडो लिटर पाणी परिसरात जमा होऊन राहते. पाण्याच्या या अपव्ययाकडे नगर पंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
नगर पालिकेच्या मुख्य वाहिनीला गळती
४गडचिरोली शहराला वैनगंगा नदीतून पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला जातो. दोन किमीच्या पाईपलाईनवर चार व्हॉल्व बसविण्यात आले आहेत. त्यापैकी शुध्दीकरण केंद्रापासून काही दूर अंतरावर असलेल्या वळणावरचा व्हॉल्व लिकेज असून या व्हॉल्वमधून दर दिवशी हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
अहेरीच्या धरमपूर वार्डात लिकेज
४अहेरी राजनगरीला नगर पंचायतीचा दर्जा मिळाला आहे. अहेरी शहराला पाणी पुरवठा योजनेतून दररोज पाणी वितरित केले जाते. शहरातील धरमपूर वार्डात मुख्य रस्त्यावर पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे दररोज शेकडो लिटर पाणी वाया जाते. सकाळी व संध्याकाळी पाणी पुरवठा झाल्यास या मार्गावर तळे साचल्यासारखे पाणी रस्त्यावरून वाहत राहते. नगर पंचायतीचे याकडे दुर्लक्ष आहे.