भाज्यांचे दर कमी होण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST2019-11-26T05:00:00+5:302019-11-26T05:00:55+5:30

हिवाळ्याच्या सुरूवातीला जिल्ह्याच्या विविध भागातून स्थानिक भाजीपाल्याची आवक वाढत असते. परंतु यावर्षी दिवाळीपूर्वी व नंतर झालेल्या परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा माल अत्यल्प येऊ लागला आहे.

Waiting for vegetable prices to drop | भाज्यांचे दर कमी होण्याची प्रतीक्षा

भाज्यांचे दर कमी होण्याची प्रतीक्षा

ठळक मुद्देहिवाळा लागला तरी फरक नाही : सर्वसामान्य गृहिणींचे बजेट कोलमडले

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : हिवाळ्याला सुरूवात झाली तरी भाजीपाल्याचे दर फारसे कमी झालेले नाही. येथील आठवडी बाजारात तसेच दैनंदिन गुजरी बाजारात मेथी, वांगी, टमाटे, कोबी आदीसह सर्वच भाज्यांचे दर अजूनही अवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे सर्वसामान्य गृहिणींचे नियोजन बिघडले आहे.
हिवाळ्याच्या सुरूवातीला जिल्ह्याच्या विविध भागातून स्थानिक भाजीपाल्याची आवक वाढत असते. परंतु यावर्षी दिवाळीपूर्वी व नंतर झालेल्या परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा माल अत्यल्प येऊ लागला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शेतकऱ्यांचा गावठी माल डिसेंबर महिन्यापासून बाजारात येण्यास चांगली सुरूवात होणार आहे. तोपर्यंत ग्राहकांना महागडा भाजीपाला खरेदी करावा लागणार आहे. मेथीची भाजी ६० ते ८० रुपये किलो, टमाटर ३० ते ३५ रुपये किलो, वांगी ३० ते ४० रुपये किलो, फुलकोबी ६० ते ८० रुपये किलो, हिरवी मिरची ४० रुपये किलो, आलू ३० रुपये किलो दराने विकले जात आहेत.
आठवडी बाजारापेक्षा गडचिरोलीच्या दैनिक गुजरी बाजारात भाजीपाला व पालेभाज्यांचे दर वाढल्याचे सोमवारी दिसून आले.
यावर्षी जून, जुलै महिना वगळता सप्टेंबर ते ऑक्टोबर अखेरपर्यंत पावसाने सातत्य कायम राखले होते. पावसामुळे भाजीपाला पिकांवर परिणाम झाला. अति पावसामुळे काही ठिकाणचे पीक उद्ध्वस्त झाले. याचा खरीप हंगामाला फटका बसला. अति पावसाचा भाजीपाला पिकाचेही मोठे नुकसान झाले. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयांचे पिकांचे नियोजन बिघडले आहे. परिणामी आता गडचिरोली शहरात नागपूर व इतर मोठ्या शहरातून भाजीपाल्याची आवक होत आहे. दिवाळीनंतर जिल्ह्याच्या विविध भागातील शेतकरी आपल्या शेतजमिनीतील भाजीपाला गडचिरोली येथील आठवडी बाजार व दैनिक गुजरी बाजारात विक्रीसाठी आणतात असतात. मात्र परतीच्या पावसामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या गावठी भाजीपाल्याची आवक लांबणीवर पडली आहे. परिणामी गडचिरोली शहर व परिसरातील नागरिकांना मोठ्या शहरातून येणाऱ्या भाजीपाल्यावरच अवलंबून राहावे लागत आहे.

वटाण्याच्या शेंगा महाग
गतवर्षी दिवाळीनंतर वटाण्याच्या शेंगा ३० ते ४० रुपये किलो दराने विकल्या जात होत्या. मात्र यंदा मोठ्या शहरातून या शेंगांची आवक होत असल्याने भाव वाढतीवर आहे. सद्य:स्थितीत वटाण्याच्या शेंगा ५० ते ६० रुपये किलो दराने विकत आहेत.

कांद्याचे भाव चढतीवरच
दिवाळीपासून कांद्याचे भाव वाढले असून हे भाव स्थिर आहेत. सद्य:स्थितीत २४ नोव्हेंबर रोजी रविवारी गडचिरोली येथे भरलेल्या आठवडी बाजारात पांढऱ्या रंगाच्या कांद्याचे भाव ८० ते १०० रुपये होते तर गुलाबी कांद्याचे भाव ६० ते ८० रुपये होते. दुपारी उशिरापर्यंत कांद्याचे भाव अनुक्रमे १०० व ८० रुपये होते. सायंकाळी मात्र पांढरे कांदे ८० रुपये किलो तर लाल कांदे ६० रुपये किलो दराने विकले जात होते. कांद्याच्या चढ्या भावाने गृहिणींच्या डोळ्यात गेल्या दीड महिन्यांपासून पाणी येत आहे. आवक वाढल्यानंतरच कांद्याचे भाव घसरण्याची शक्यता आहे.

Web Title: Waiting for vegetable prices to drop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार