दामरंचा मार्गावरील तलाव खोलीकरणाच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: August 25, 2016 01:04 IST2016-08-25T01:04:03+5:302016-08-25T01:04:03+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील तलावाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून तिसऱ्या क्रमांकाचा नवीन तलाव दामरंचा मार्गावर आहे.

दामरंचा मार्गावरील तलाव खोलीकरणाच्या प्रतीक्षेत
कालवा लिकेज : २५ हेक्टर क्षेत्र असलेला तिसऱ्या क्रमांकाचा तलाव
श्रीधर दुग्गीरालापाठी कमलापूर
गडचिरोली जिल्ह्यातील तलावाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून तिसऱ्या क्रमांकाचा नवीन तलाव दामरंचा मार्गावर आहे. सदर तलाव २५ हेक्टर क्षेत्रामध्ये व्यापलेला आहे. मात्र गेल्या २७ वर्षांपासून एकदाही या तलावाचे खोलीकरण करण्यात आले नाही. तसेच या तलावाचा कालवा अनेक ठिकाणी लिकेज असल्याने येथील पाणी व्यर्थ जात आहे. परिणामी कमलापूर, चिंतलगुडम, कोळसेलगुडम, थिमारगुडम या क्षेत्रातील शेकडो शेतकरी पुरेशा सिंचन सुविधेपासून वंचित आहेत.
दामरंचा मार्गावरील या तलावात ३०० ते ४०० हेक्टर शेतीला पाणी पुरेल एवढा पाणीसाठा या तलावात आहे. मात्र या तलावाचा कालवा अनेक ठिकाणी लिकेज असल्याने पाणी व्यर्थ जात आहे. या तलावाचे खोलीकरण करणे अत्यावश्यक आहे. यासंदर्भात कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग चंद्रपूर यांना निवेदन करून त्यांच्याकडे वारंवार पाटपुरावा करण्यात आला. मात्र सदर तलावाच्या खोलीकरण व नव्या कालव्याच्या निर्मितीकडे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर्णत: दुर्लक्ष केले. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो.
कमलापूरवरून ४ किमी अंतरावर असलेले सदर नवीन तलाव हे पर्यटनस्थळसुद्धा बनलेले आहे. येथे वन विभागाचे हत्ती कॅम्प आहे. तसेच सभोवताल पहाडी व निसर्गरम्य वातावरण तसेच नागमाता मंदिरही आहे. त्यामुळे शासनाने सदर स्थळाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्यास या भागाच्या विकासाला चालना मिळेल. उपसा सिंचन योजनेतून दामरंचा नजीकच्या नदीतील पाणी या तलावात सोडण्यात यावे, यातून मोठी शेती सिंचन सुविधा निर्माण होऊ शकते. सदर तलावाच्या खोलीकरणासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
लोकप्रतिनिधींचा कानाडोळा
निवडणुकीच्या वेळी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नेते दामरंचा गावात येऊन नागरिकांना सदर तलावाचे खोलीकरण करण्यात येईल, तसेच नवीन कालवा तयार करण्यात येईल, असे आश्वासन देतात. मात्र निवडून आलेल्या एकाही लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत या तलावाच्या दुरूस्तीच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांच्या कार्यप्रणालीबाबत प्रचंड नाराज आहेत.