धानाच्या हमीभावाची प्रतीक्षा
By Admin | Updated: January 3, 2015 01:18 IST2015-01-03T01:18:44+5:302015-01-03T01:18:44+5:30
जिल्ह्यातील धानपीक निघाले आहे. परंतु अनेक तालुक्यातील गावांमध्ये अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत.

धानाच्या हमीभावाची प्रतीक्षा
देसाईगंज : जिल्ह्यातील धानपीक निघाले आहे. परंतु अनेक तालुक्यातील गावांमध्ये अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू होण्याची तसेच धानाला हमी भाव मिळण्याची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात धानपीक प्रमुख पीक म्हणून ओळखले जाते. अनेक शेतकरी खरीप धानपिकाची लागवड करतात. काही शेतकरी उन्हाळी धानपिक लावगड करतात. मात्र धानपिक निघाल्यानंतर शेतकऱ्यांना हमीभावाची प्रतीक्षा असते. हमीभाव मिळविण्यासाठी शेतकरी चळवळ उभारतात. मात्र या चळवळीला पाठबळ मिळत नसल्याचे चित्र आहे. धान निघाल्यानंतर अनेक गावांमध्ये खासगी व्यापारी आपला धंदा थाटतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे धान मातीमोल किमतीत खासगी व्यापाऱ्यांच्या घश्यात जात असते. आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमार्फत अनेक गावांमध्ये धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. परंतु अनेक गावांना धान खरेदी केंद्राची अद्यापही प्रतीक्षा आहे. परिणामी शेतकऱ्यांना हमीभाव मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष होते. कर्मचाऱ्यांना नक्षलग्रस्ता भत्ता दिला जातो. मात्र शेतकऱ्यांना हमीभावही दिला जात नाही. संपूर्ण जिल्हा नक्षलग्रस्त घोषित करण्यात आला आहे. नक्षलग्रस्त भत्ता अनेक कर्मचाऱ्यांना दिला जात आहे. मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हमीभावासाठी लढावे लागते. अशी परिस्थिती सद्यस्थितीत दिसून येत आहे. शेतकऱ्यांची दैनावस्था झाल्याने त्यांना सरकारचे तसेच लोकप्रतिनिधींचे पाठबळ मिळत नसल्याचे दिसून आले आहे. (वार्ताहर)
धान खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब
जिल्ह्यात मोजक्याच ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र सिरोंचा तालुक्यातील तीन आष्टी परिसरातील, आरमोरी तालुक्यातील अनेक धान खरेदी केंद्र अद्यापही सुरू झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले धान्य खासगी व्यापाऱ्यांना मातीमोल किंमतीत विकावे लागत आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.