वैनगंगा नदीचा जलस्तर घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2017 01:22 IST2017-04-08T01:22:58+5:302017-04-08T01:22:58+5:30
देसाईगंज, गडचिरोली नगर पालिकांसह जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजना असलेल्या वैनगंगा नदीचा जलस्तर ....

वैनगंगा नदीचा जलस्तर घटला
पाणी संकट गंभीर होणार : इनटेक वेलकडे नदीचा प्रवाह वळविण्यासाठी बांधला बांध
गडचिरोली : देसाईगंज, गडचिरोली नगर पालिकांसह जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजना असलेल्या वैनगंगा नदीचा जलस्तर एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच घसरला आहे. त्यामुळे गडचिरोली शहराच्या पाणी पुरवठ्यावर याचा थेट परिणाम झाला असून वैनगंगेवर अवलंबून असणाऱ्या बहुतांशी पाणी पुरवठा योजनांना वैनगंगेचा जलस्तर आटल्याने पाण्याचे संकट आता भेडसावू लागले आहे. यामुळे गडचिरोली नगर पालिकेच्या प्रशासनाने पदाधिकाऱ्यांसह वैनगंगा नदीच्या परिसराची पाहणी करून तत्काळ नदीच्या पाणी असणाऱ्या भागावर बांध बांधून टाकीच्या बाजूला पाणी वळविण्यासाठी उपाययोजना केली आहे.
गडचिरोली शहराची लोकसंख्या ५० हजाराच्या घरात असून दर दिवशी ६२ लाख लिटर पाणी शहराला लागते. याशिवाय इतर २५ गावातील ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनाही वैनगंगेच्याच जलस्तरावर अवलंबून आहेत. नदीचे पात्र आटल्यामुळे गडचिरोली शहराच्या फुले वार्ड, वंजारी मोहल्ला आदी भागाला गेल्या तीन दिवसांपासून पाणी पुरवठा झालेला नाही व शहराच्या इतर भागातही अल्प प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नगर पालिका प्रशासनाने वैनगंगेचा जलस्तर इनटेकवेलकडे वळविला आहे. इनटेकवेलमध्ये पाणी जाण्यासाठी नदी पात्रात विहीर खोदण्यात आली आहे. या विहिरीमध्ये दोन मोठमोठ्या पाईपच्या सहाय्याने पाणी जाते. मात्र नदीची धार आटल्याने यातील एक पाईप पूर्णपणे बाहेर निघाले तर दुसरे पाईप अर्धेच नदीमध्ये बुडून होते.
अर्ध्या पाईपातून इनटेक वेलमध्ये पुरेसे पाणी जात नसल्याने जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत अपुऱ्या पाण्याचा पुरवठा होत होता. नदीची धार आटली असल्याची बाब नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी नगरसेवक प्रमोद पिपरे यांच्यासह पाहणी केली. गुरूवारी नदीमध्ये तात्पुरते बांध बांधून इनटेक वेलच्या बाजूने पाणी वळते केले आहे. उष्णतामान वाढत राहिल्यास एप्रिल अखेरपर्यंत जलसंकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. (नगर प्रतिनिधी)