सेवापुस्तिकांची पडताळणी सुरू
By Admin | Updated: February 11, 2015 01:57 IST2015-02-11T01:57:48+5:302015-02-11T01:57:48+5:30
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या प्रयत्नाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सेवा ..

सेवापुस्तिकांची पडताळणी सुरू
मुरूमगाव : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या प्रयत्नाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सेवा पुस्तिकांची पडताळणी करण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे. सेवा पुस्तिकांच्या पडताळणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याने आता जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांच्या सेवापुस्तिका अध्यावत होणार आहे. परिणामी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या कटकटी संपणार आहेत.
जिल्हा परिषदेने शिक्षण विभागातील सक्षम अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात सेवापुस्तिका पडताळणी पथक तयार केले आहे. सदर पथक आता पंचायत समितीतील सर्व प्राथमिक शिक्षकांच्या सेवा पुस्तिका मागवून त्यांची निक्षून पडताळणी सुरू केली आहे. प्राप्त झालेल्या सेवा पुस्तिकांमधील त्रुट्यांवर निराकरणाच्या दृष्टीने वेळीच मार्गदर्शक सूचना दिल्या जात आहे. यापूर्वी वर्षभर तसेच काही सेवापुस्तिका अनेक वर्ष अडगळीत कोऱ्याच पडलेल्या दिसून येत होत्या. त्यामुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ, राज्य, विभाग, जिल्हा, तालुका तसेच केंद्रस्तरावरील विविध प्रशिक्षण, पुरस्कार, प्रावीण्य व शैक्षणिक व्यावसायिक पात्रता संपादन केल्याच्या नोंदी अद्यावत राहत नसल्यामुळे सेवानिवृत्तधारकांना अनेक महिने संबंधित कार्यालयाच्या येरझारा माराव्या लागत होत्या.
स्थानांतरण झालेल्या शिक्षकांच्या एलपीसी त्वरित न आल्याने दोन-दोन महिने वेतनाविना शिक्षकांना राहावे लागत होते. मात्र आता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सर्व प्राथमिक शिक्षकांच्या सेवापुस्तिका अद्यावत करण्याच्या कामाला सुरुवात केली असल्यामुळे ही विवंचना थांबणार आहे. शिक्षकांच्या अर्जित रजा, वैद्यकीय रजा, अनाधिकृत खाडा तसेच वेतनात कपात झाली किंवा नाही, किती कालावधीसाठी किती, केव्हा व किती कालावधीचे वेतन काढले. तसेच कोणत्या कालावधीचे वेतन काढण्यात आले नाही, आदींची नोंद पूर्वीच्या सेवापुस्तिकांमध्ये करण्यात येत नव्हती. दिरंगाईमुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांचे गुन्हे, शिक्षा, लाभ, सवलती तसेच महाराष्ट्र दर्शन योजनांच्या लाभाची मोजदाद होत नव्हती. त्यामुळे प्रत्येक संधी नेहमीच्याच शिक्षक, कर्मचाऱ्यांना मिळत होत्या.
परिणामी अनेक पात्र शिक्षकांवर अन्याय होत असे. सेटिंगसाठी आर्थिक व्यवहारालाही वाव होता, मात्र आता अद्यावत सेवापुस्तिकांमुळे या सर्व प्रकाराला आळा बसेल व शिक्षणक्षेत्र पवित्र होईल. (वार्ताहर)