मुख्य मार्गावर वाहनांचे बस्तान
By Admin | Updated: June 7, 2015 02:00 IST2015-06-07T02:00:23+5:302015-06-07T02:00:23+5:30
शहरातील मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूला खासगी प्रवासी वाहने तासणतास उभी राहत असल्याने वाहतुकीचा खोळंबा

मुख्य मार्गावर वाहनांचे बस्तान
आरमोरी वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष : अपघाताची शक्यता बळावली
आरमोरी : शहरातील मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूला खासगी प्रवासी वाहने तासणतास उभी राहत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत असून अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे. मात्र याकडे शहर वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे.
आरमोरी हे जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. या शहरातून ब्रह्मपुरी, नागपूर, देसाईगंज व गडचिरोलीकडे जाता येत असल्याने मुख्य मार्गावर नेहमीच चारचाकी व दुचाकी वाहनांची वर्दळ राहते. शहरात रस्ता दुभाजक नसल्याने बहुतांश वाहने रस्त्याच्या मधूनच ये-जा करतात. बाजुला दुकानदारांनी अतिक्रमण करून जागा बळकाविली आहे. तर दुसरीकडे प्रवासी वाहतूक करणारे काळीपिवळी, टॅक्सी वाहने याच ठिकाणी ठेऊन प्रवासी गोळा करतात. सामान घेऊन येणारे ट्रकही रस्त्याच्या बाजुला उभे करून मालाची उचल केल्या जाते. तासणतास ही वाहने रस्त्याच्या बाजुला राहत असल्याने विशेषकरून पायदळ जाणाऱ्या व सायकलस्वारांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी एका वाहतूक पोलिसाची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र वाहतूक पोलीस नेमकी कुठली वाहतूक नियंत्रित करते, याचा पत्ता लागत नाही. शहरातील बसस्थानकाजवळ नेहमीच वाहनांची वर्दळ राहते. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक पोलीस असणे गरजेचे असतानाही वाहतूक पोलिसांचे मात्र दर्शनच लाभत नाही. रस्त्याच्या बाजुला वाहने उभे करून प्रवासी भरले जात असल्याने याला वाहतूक पोलिसाचेच अभय असल्याचेही बोलले जात आहे. पोलिसांचा धाक नसल्याने वाहनधारकांची मनमानी वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)