अपंग आचलच्या यशाने घाटी उजळली
By Admin | Updated: June 14, 2015 01:54 IST2015-06-14T01:54:20+5:302015-06-14T01:54:20+5:30
जन्मापासून दोन्ही हातांनी अपंग. परंतु प्रचंड इच्छाशक्तीच्या भरवशावर शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या घाटी येथील आचल प्रदीप राऊत या....

अपंग आचलच्या यशाने घाटी उजळली
उजव्या पायाने लिहिला पेपर : दहावीत ७७.४० टक्के गुण मिळवून शाळेत पहिली
कुरखेडा : जन्मापासून दोन्ही हातांनी अपंग. परंतु प्रचंड इच्छाशक्तीच्या भरवशावर शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या घाटी येथील आचल प्रदीप राऊत या विद्यार्थिनीने उजव्या पायाच्या बोटांनी दहावीच्या परीक्षेचा पेपर लिहून या परीक्षेत ७७.४० टक्के गुण मिळविले. तिच्या या अतुलनिय यशाने कुरखेडा तालुक्यातील घाटी हे गाव उजळून निघाले आहे. तिच्या या यशाची शाळेसह परिसरातील पंचक्रोशीतही मोठी चर्चा सध्या आहे.
घाटी येथील कै. विठ्ठलराव बनपुरकर विद्यालयात शिकत असलेली आचल प्रदीप राऊत ही विद्यार्थिनी जन्मापासून दोन्ही हातांनी अपंग असली तरी तिने या अपंगत्त्वाचा कधीही बाऊ केला नाही. प्रचंड जिद्द, चिकाटी आणि मेहनत याच्या भरवशावर केवळ शाळेत शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाच्या भरवशावर तिने अतुलनिय बुध्दीमत्तेच्या भरवशावर दहावीच्या परीक्षेत हे यश मिळविले आहे. शाळेत शिकविलेल्या अभ्यासाचीच उजळणी घरी येऊन करणे हा तिचा नित्यक्रम होता. शिक्षकांनी दिलेला गृहपाठ पूर्ण करणे व अभ्यास करताना वेळेचे कधीही भान न ठेवणे या भरवशावर आचलने हे यश मिळविले आहे. दहावीच्या परीक्षेत तिने उजव्या पायाने पेपर सोडवून ५०० पैकी ३८७ गुण घेतले व ती शाळेतून पहिली आली आहे. भविष्यात उच्च शिक्षण घेऊन न्यायाधीश होण्याची तिची इच्छा आहे. तिने आपल्या या यशाचे श्रेय आई-वडील व शिक्षकांना दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)