शेततळ्याच्या पाळीवरील मुरुमाचा रस्त्यासाठी वापर
By Admin | Updated: February 21, 2016 00:43 IST2016-02-21T00:43:54+5:302016-02-21T00:43:54+5:30
कृषी विभागाकडून आरमोरी तालुक्यातील वैरागड, मेंढाबोडी येथील तीन शेतकऱ्यांना ९ लाख रूपयांचा निधी खर्च करून ...

शेततळ्याच्या पाळीवरील मुरुमाचा रस्त्यासाठी वापर
कंत्राटदाराची मनमानी : अवैध उत्खननाबाबत महसूल विभागही अनभिज्ञ
वैरागड : कृषी विभागाकडून आरमोरी तालुक्यातील वैरागड, मेंढाबोडी येथील तीन शेतकऱ्यांना ९ लाख रूपयांचा निधी खर्च करून सन २०१४-१५ या वर्षात शेततळे बांधून दिले. मात्र मागील सात-आठ महिन्यांपासून काही कंत्राटदार या शेततळ्याच्या पाळीवरील मुरमाचे अवैधरित्या उत्खनन करीत आहे. मात्र याबाबत महसूल विभागही प्रचंड अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.
पावसाचे पाणी वाहून जाऊ नये, याकरिता राज्य शासनाने खोदतळे व शेततळे बांधून देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना चांगली सिंचन सुविधा देखील निर्माण होत आहे. राज्य शासनाच्या याच योजनेतून वैरागड, मेंढेबोडी येथील शेतकरी विद्याधर जगन आयटलवार, कमला चित्तू मडावी व माणिक कांबळी या तीन शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत ९० लाख रूपये खर्च करून सामूहिक शेततळे बांधण्यात आले.
मात्र काही कंत्राटदाराने या शेततळ्याच्या पाळीवरील मुरमाचे अवैधरित्या उत्खन्न करून रस्ता कामासाठी सदर मुरूम वापरत असल्याचे उजेडात आले आहे. विशेष म्हणजे संबंधित कंत्राटदारांनी या उत्खननाबाबत महसूल विभागाची परवानगी घेतली नाही. चार महिन्यांपूर्वी वैरागड येथील कहार मोहल्ला ते नदीघाटाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी शेततळ्याच्या पाळीवरील मुरमाचा वापर करण्यात आला आहे.
याशिवाय आता वैरागड शेजारी असणाऱ्या काही गावात सदर मुरूम पोहोचविल्या जात असल्याची माहिती आहे. (वार्ताहर)