माहितीचा उपयोग जीवनमान उंचावण्यासाठी करा
By Admin | Updated: January 31, 2016 01:25 IST2016-01-31T01:25:05+5:302016-01-31T01:25:05+5:30
लोक माहिती अभियानादरम्यान कधीही मिळाली नाही, एवढी महत्त्वाची माहिती विविध व्याख्यानसत्रातून तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे.

माहितीचा उपयोग जीवनमान उंचावण्यासाठी करा
राणी बंग यांचे आवाहन : आरमोरीत लोक माहिती अभियानाचा समारोप
आरमोरी : लोक माहिती अभियानादरम्यान कधीही मिळाली नाही, एवढी महत्त्वाची माहिती विविध व्याख्यानसत्रातून तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे. या माहितीचा प्रत्यक्ष उपयोग होण्यासाठी सदर उपयुक्त माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. लोक माहिती अभियानाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीचा उपयोग जीवनमान उंचाविण्यासाठी करा, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. राणी बंग यांनी केले.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने शनिवारी स्थानिक महात्मा गांधी स्व. न.प. वाणिज्य महाविद्यालयात लोक माहिती अभियानाचा समारोप करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर वनमाळी, उपप्राचार्य डॉ. रमेश ठोंबरे, संजय आर्वीकर, जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ. शैलजा मैदमवार, प्रा. योगिता सानप, शुभदा देशमुख, जि.प.चे महिला व बाल कल्याण अधिकारी सचिन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकास योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यात आरमोरी येथील लोक माहिती अभियान यशस्वी झाले. या माहितीचा उपयोग स्वत:सह समाजासाठी करावा, असे जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी आपल्या भाषणातून सांगितले. संचालन सुरेश गांजरे यांनी केले तर आभार संजय आर्वीकर यांनी मानले. प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना गट विकास अधिकारी मनोज सोनोने यांच्या हस्ते पारितोषीक देण्यात आले. यावेळी शासकीय अधिकाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
माता व बालमृत्यू रोखण्याच्या उपाययोजनांवरही मार्गदर्शन
जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या रक्त संक्रमण अधिकारी डॉ. शैलजा मैदमवार यांनी ‘मिशन इंद्रधनुष्य’ या विषयावरील व्याख्यानात संपूर्ण बालकांचे लसीकरण माता व बालमृत्यू रोखण्यासाठीच्या विविध उपाययोजनांबाबत चित्रफितीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. याशिवाय कृषी विकास व महिला या विषयावर बोलताना महिलांनी केवळ शिक्षीत नव्हे तर सुशिक्षीत होण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. शुभदा देशमुख यांनी महिलांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.