अवकाळी पावसाने मोहटोला परिसराला झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:59 IST2021-05-05T04:59:45+5:302021-05-05T04:59:45+5:30
कोरोनाचे अस्मानी संकट दारात उभे आहे. अशातच अवकाळी पावसानेदेखील परिसराला झोडपून काढले आहे. यात शेतकरी पुरता बेजार झाल्याचे चित्र ...

अवकाळी पावसाने मोहटोला परिसराला झोडपले
कोरोनाचे अस्मानी संकट दारात उभे आहे. अशातच अवकाळी पावसानेदेखील परिसराला झोडपून काढले आहे. यात शेतकरी पुरता बेजार झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अंदाजे २०० एकरात कारले उत्पादनासहित वांगी, भेंडी, टोमॅटो,चवळी व अन्य पिकाचे उत्पादन परिसरात घेतल्या जातात. सोबतच मोठ्या प्रमाणात रब्बी धानाची लागवडसुद्धा केली आहे.
यात मोहटोला, किन्हाळा, विहीरगाव, पोटगाव, विठ्ठलगाव, पिंपळगाव(ह.), डोंगरगाव (ह.), चिखली तुकूम, चिखली रिठ व अरततोंडी आदी गावांचा समावेश आहे. किन्हाळा व अरततोंडी (जुनी) या परिसरात मोठ्या प्रमाणात विटा तयार केल्या जातात. विटभट्ट्या मालकांचे तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तयार विटा आणि भट्ट्या जमीनदोस्त झाल्या आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात आम्रवृक्ष आहेत. संबंधित सर्व आम्रवृक्ष मालकीची आहेत. येथील आंबा चवदार व रसरशीत असून या आंब्याला बाजारात खूप मागणी आहे. आम्रवृक्षाला येणाऱ्या बहरापासून तर आंबा निघेपर्यंत देखभाल केली जाते. परंतु तोंडावर आंबे तोडणीचा हंगाम असतानाच अवकाळी पावसात झाडावर असणाऱ्या ७५ टक्के आंब्यांचा सडा जमिनीवर पडल्याचे पाहावयास मिळत आहे. सर्वत्र संचारबंदी असल्याने उत्पादित शेतमालाला योग्य भाव मिळत नसतानाच आहे तेही पावसाने घेऊन गेल्याने मोहटोला परिसरातील शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले.