आरमोरीच्या विठ्ठलरावांचे अनोखे गांधीप्रेम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:00 IST2019-10-03T06:00:00+5:302019-10-03T06:00:33+5:30
विठ्ठलराव हे बालपणीच महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रभावित झाले. आज वयाच्या ८५ व्या वर्षीही त्यांचे गांधी प्रेम अजूनही तितकेच कायम आहे. आरमोरीत १९३५ साली जन्मलेल्या विठ्ठलराव यांचे मातृछत्र बालपणीच हरपले. त्यात वडीलसुद्धा देशप्रेमाने झपाटल्याने ते सैन्यदलात दाखल झाले.

आरमोरीच्या विठ्ठलरावांचे अनोखे गांधीप्रेम
अतुल बुराडे/विष्णू दुनेदार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा/तुळशी : आजपासून तब्बल १५० वर्षांपूर्वी गुजरात राज्याच्या पोरबंदर येथे जन्मलेल्या महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रभावित झालेले आरमोरी येथील विठ्ठलराव काशिनाथ गुुड्डेवार हे अद्यापही गांधी विचार कायम ठेवले आहे. महात्मा गांधी जयंती व पुण्यतिथीच्या दिवशी गुड्डेवार हे स्वत:च आपल्या पेटी चरख्यावर सुतापासून हार तयार करतात. सदर सुताचे हार अर्पण करून श्रद्धांजली वाहतात. एकूणच गुड्डेवार यांचे अनोखे गांधी प्रेम अद्यापही कायम आहे.
विठ्ठलराव हे बालपणीच महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रभावित झाले. आज वयाच्या ८५ व्या वर्षीही त्यांचे गांधी प्रेम अजूनही तितकेच कायम आहे. आरमोरीत १९३५ साली जन्मलेल्या विठ्ठलराव यांचे मातृछत्र बालपणीच हरपले. त्यात वडीलसुद्धा देशप्रेमाने झपाटल्याने ते सैन्यदलात दाखल झाले. परिणामी मोठ्या वडिलाने विठ्ठलरावांचे पालनपोषण केले. भारत स्वतंत्र होईपर्यंत विठ्ठलरावांचे बालपण पारतंत्र्यात गेले. विठ्ठलरावांच्या घरचे व आजूबाजूचे वातावरण भारत देशाप्रती अभिमान बाळगणारे होते. १९४२ चे ‘चले जाव आंदोलन’ व देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधी यांचे व्यक्तीमत्व सर्वात केंद्रस्थानी होते. अशा या व्यक्तीमत्वांचे विचार चौफेर घुमू लागले. दरम्यान गांधी विचारांच्या फेऱ्यात विठ्ठलराव कसेकाय सापडले, जे आजही त्यातून बाहेर पडू शकले नाही. भविष्यात सुद्धा असेच गांधी प्रेम कायम राहणार, असा दुर्धम्य आशावाद विठ्ठलराव आपल्या बोलणातून व्यक्त करतात. विठ्ठलराव हे आजही गांधी विचाराने जीवन जगत आहेत. गांधीविषयी असलेला त्यांचा लढा व स्नेह इतरांना प्रेरणा देणारा असाच आहे.
स्वच्छतेसह गांधींचे अनेक विचार आत्मसात
विठ्ठलराव गुड्डेवार हे महात्मा गांधी यांना एक विचार मानतात. महात्मा गांधी यांची सर्वधर्म समभाव जपणारी प्रार्थना प्रत्येकाने आत्मसात करावी, असे ते आवर्जुन सांगतात. गांधीजींच्या जीवनातून प्रेरणा म्हणून विठ्ठलराव हे आजही खादी वस्त्र वापरतात. चरखा, खादी व गांधी यांचे अतुट समिकरण तयार झाले आहे. खादी म्हणजे सादे वस्त्र नाही तर ते सुद्धा एक विचार असल्याचे विठ्ठलराव सांगतात. साधी राहणी, मांस व्यर्ज व स्वच्छता हे तीन सुत्र विठ्ठलराव कायमपणे जपत आहेत.