दुष्काळ जाहीर करताना काही गावांवर अन्याय
By Admin | Updated: November 13, 2015 01:29 IST2015-11-13T01:29:05+5:302015-11-13T01:29:05+5:30
राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करताना तालुका घटक न मानता गाव हा घटक ठेवून दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली.

दुष्काळ जाहीर करताना काही गावांवर अन्याय
शेतकऱ्यांची मागणी : ५० पैशापेक्षा अधिक पैसेवारी असलेल्या गावांना सवलती द्या
वैरागड : राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करताना तालुका घटक न मानता गाव हा घटक ठेवून दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली. त्यामुळे परंपरागत परिस्थितीने पैसेवारी काढताना काही गावांवर अन्याय झाला. ज्या गावाची आणेवारी ५० पैशापेक्षा अधिक आहे. अशाही गावांना कमी प्रमाणात का होईना सोयी- सवलती द्याव्या, अशी मागणी वैरागड परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
दुष्काळ जाहीर करताना प्रत्येक गावांची स्थिती वेगळी असल्याने ज्या गावांची पैसेवारी कमी आहे त्यांना मदत केलीच पाहिजे. परंतु आज ज्यांची पिके उभी आहेत. त्यांनी कोणत्या परिस्थिती पिके उभी केलीत याचाही विचार होणे गरजेचे आहे. पाण्याची कुठलीही सुविधा उपलब्ध नसताना अनेक शेतकऱ्यांनी एक ते दोन किलोमिटर अंतरावरून सिंचनाची सोय उलपब्ध करून पिकांना पाणी दिले व कसेबसे आपले पीक वाचविले. सिंचनाची सोय करताना भरपूर पैसा खर्च झाला. हा खर्च उत्पादन खर्चापेक्षा सिंचन सोयी व कीटकनाशकांवर अधिक झाला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कसेबसे धान पीक वाचविले. अशा शेतकऱ्यांनाही सोयी- सुविधा मिळणे गरजेचे आहे. ५० हून अधिक आणेवारी असणाऱ्या गावातील अनेक शेतकऱ्यांचे धान पीक पावसाअभावी नष्ट झाले. त्यामुळे या गावांतील अशा शेतकऱ्यांना शासनाच्या नियमांमुळे वंचित राहण्याची वेळ आली आहे. रोजगार हमी योजनेतून विविध कामे मंजूर करून वन, कृषी विभाग व ग्रा. पं. स्तरावर कामे सुरू करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करताना गाव हा घटक गृहित धरला असला तरी ५० टक्केच्यावर पैसेवारी असणाऱ्या गावांना या वर्षात पाणी टंचाई व चारा टंचाईची झळ पोहोचणार आहे. त्यामुळे शासनाने अशाही गावांची दखल घ्यावी.
- मनोहर बावनकर, शेतकरी, वैरागड
या वर्षात दमट हवामानामुळे धान पिकावर प्रचंड रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे रोगांचा बंदोबस्त करताना शेतकऱ्यांचा बराच पैसा खर्च झाला. पैसा खर्च करूनही रोग आटोक्यात आला नाही. परिणामी शेतकरी हतबल झाला. त्यामुळे शासनाने या शेतकऱ्यांना मदत करावी.
- महेंद्र तावेडे, शेतकरी, वैरागड.
रबी हंगामही बुडाला
अत्यल्प पावसामुळे जमिनीतील ओलावा नष्ट झाल्याने यंदाचा रबी हंगामही बुडाला आहे. दरवर्षी शेतकरी उडीद, मूग, हरभरा, जवस, मसूर, ज्वारी, गहू यासह अनेक कडधान्य पिकाचे उत्पादन घेत होते. परंतु रबी हंगामासाठी आवश्यक असणारा ओलावा जमिनीत नसल्याने रबी हंगाम बुडाला आहे.