दोन अपघातात दोन ठार;१० जखमी

By Admin | Updated: June 11, 2014 00:01 IST2014-06-11T00:01:38+5:302014-06-11T00:01:38+5:30

येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये दोघेजण जागीच ठार झाले असून १० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. एका अपघातात अपघातग्रस्त दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत.

Two killed in two accidents, 10 injured | दोन अपघातात दोन ठार;१० जखमी

दोन अपघातात दोन ठार;१० जखमी

आरमोरी : येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये दोघेजण जागीच ठार झाले असून १० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. एका अपघातात अपघातग्रस्त दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत.
नागभिडवरून चंद्रपूरकडे येत असताना एमएच ३४ एए ३०९० क्रमांकाच्या कारचे अरसोडा फाट्याजवळ जीवानी राईसमीलच्या समोर टायर फुटल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या बाजुला जाऊन पलटली. या अपघातात एकजण जागीच ठार तर ५ जण गंभीर जखमी झाले. सदर अपघात मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडला. यातील मृतकाचे नाव अंकूश उमाजी धंदरे (१५) रा. वासाळा, असे आहे. जखमींमध्ये निखील होमदेव देशमुख रा. नागभिड, हर्षल विनोद रोहणकर रा. अड्याळ ता. ब्रह्मपुरी, कल्पना उमाजी धंदरे (३८) रा. वासाळा, उमाजी नक्टू धंदरे (४५) रा. वासाळा, अर्पिता उमाजी धंदरे (११) रा. वासाळा, वाहनचालक संदीप मनोहर रोहणकर (४५) रा. नागभिड यांचा समावेश आहे. हे सर्व नागभिड येथे लग्नकार्य आटोपून वासाळाकडे परत जात होते. जखमींना आरमोरी येथे उपचारासाठी भरती करण्यात आले. उमाजी नक्टू धंदरे यांना वगळून इतर सर्वांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
दुसऱ्या अपघातात आरमोरीपासून ४ किमी अंतरावरील वैनगंगा नदीच्या पुलावर मोटारसायकल व कार यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेत एक जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. आरमोरीकडे दुचाकीस्वार ब्रह्मपुरीवरून आरमोरीकडे येत होते. तर कार आरमोरीवरून ब्रह्मपुरीकडे जात होती. दोन्ही वाहनांनी वैनगंगा नदीच्या पुलावर एकमेकांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहने जळून खाक झाली. या अपघातात दुचाकीवरील प्रशांत दिनकर गुरनुले (९) हा जागीच ठार झाला तर मानिक काशीराम कोडाप (२९) रा. बालापूर तळोधी, छाया वासुदेव वसाकी (४०) रा. बालापूर तळोधी, नोबेल लोमेश गुरनुले (१३) रा. मिनघरी ता. सिंदेवाही, सागर विलास गुरनुले (११) रा. मिनघरी हे चौघेजण जखमी आहेत. महत्वाचे म्हणजे हे पाचही जण एकाच दुचाकीवर पोर्ला येथे जात होते. जखमींना गडचिरोली येथील रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. सदर अपघात एवढा भिषण होता की, अपघात घडताच कार व दुचाकी या दोन्ही वाहनांनी पेट घेतला. लागलेल्या आगीत दोन्ही वाहने जळून खाक झाली. पुलाच्या अगदी मधोमध घटना घडल्याने एक तास वाहतुक विस्कळीत झाली होती. आग विझविण्यासाठी देसाईगंज येथील अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. माजी आमदार हरीराम वरखडे यांनी रूग्णालयात जाऊन विचारपूस केली. अधिक तपास आरमोरीचे ठाणेदार मोरे करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Two killed in two accidents, 10 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.