दीडशे रुपयांच्या लाभासाठी बँक खाते उघडण्याचा आटापिटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:26 IST2021-07-16T04:26:12+5:302021-07-16T04:26:12+5:30
मागील सत्राच्या उन्हाळी सुटीतील ३४ दिवसांची शालेय पोषण आहाराची रक्कम विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. त्यात पहिली ते पाचवीसाठी दर ...

दीडशे रुपयांच्या लाभासाठी बँक खाते उघडण्याचा आटापिटा
मागील सत्राच्या उन्हाळी सुटीतील ३४ दिवसांची शालेय पोषण आहाराची रक्कम विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. त्यात पहिली ते पाचवीसाठी दर दिवशी प्रति विद्यार्थ्यांना ४.४८ रुपयांप्रमाणे १५६ रुपये ८० पैसे तर सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांना दर दिवशी प्रति विद्यार्थी ६.७१ रुपयांप्रमाणे २४४ रुपये ८५ पैसे मिळणार आहेत. इतक्या कमी रकमेसाठी ग्रामीण भागातील पालकांना विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडणे गैरसोयीचे ठरत आहे. सध्या ग्रामीण भागात रोवणी हंगाम सुरू झाला असून विद्यार्थ्यांचे पालक दिवसभर कामासाठी शेतावर जात असतात त्यामुळे बँक खाते उघडण्यासाठी पालकांना मजुरी बुडविण्याची वेळ आली आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना सुवर्णमहोत्सवी, अल्पसंख्यांक, सावित्रीबाई फुले याेजना आदी शिष्यवृत्तीसाठी बँक खाते काढण्यात आले होते. मात्र, अनेक पालकांनी अद्यापही अशी खाती काढली नसल्याचे चित्र आहे. ज्यांनी खाती काढली त्यापैकी काहींना पैसे मिळाले तर काही विद्यार्थ्यांच्या खात्यावर आर्थिक व्यवहार झालेले नाहीत. विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये किमान रक्कम शिल्लक नसल्याने विद्यार्थ्यांची अनेक खाती बंद पडली आहेत. त्यामुळे शालेय पोषण आहाराची रक्कम बँक खात्यात जमा न करता विद्यार्थ्यांना रोख रक्कम द्यावी किंवा त्या रक्कमेचे धान्य विद्यार्थ्यांना वाटप करावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.