महिला काँग्रेसचे संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करा

By Admin | Updated: December 2, 2015 01:08 IST2015-12-02T01:08:21+5:302015-12-02T01:08:21+5:30

शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव नाही, महागाई, रखडलेले सिंचन प्रकल्प, दुष्काळ आदीसह महाराष्ट्र राज्यात महिलांचे विविध प्रश्न कायम आहेत.

Try to increase the organization of women's Congress | महिला काँग्रेसचे संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करा

महिला काँग्रेसचे संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करा

गडचिरोलीत मेळावा : चारूलता टोकस यांचे आवाहन
गडचिरोली : शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव नाही, महागाई, रखडलेले सिंचन प्रकल्प, दुष्काळ आदीसह महाराष्ट्र राज्यात महिलांचे विविध प्रश्न कायम आहेत. भाजप प्रणित सरकारचे जनमानसांविरूध्द असलेले धोरण गावागावात जाऊन सांगा तसेच गाव पातळीपासून तालुका व तालुका पातळीपासून जिल्हा व राज्यस्तरापर्यंत महिला काँग्रेसचे संघटन वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न करा, असे आवाहन महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस यांनी केले.

जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी आयोजित महिला कार्यकर्त्या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार मारोतराव कोवासे होते. प्रमुख अतिथी म्हणून महिला प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव वनमाला राठोड, अमरावतीच्या जिल्हाध्यक्ष छाया दंडाळे, प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव सगुणा तलांडी, प्रदेश महासचिव प्रभाकर वासेकर, ज्येष्ठ नेते जेसा मोटवानी, धानोरा पं.स.च्या सभापती कल्पना वड्डे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, देसाईगंजच्या नगरसेविका निलोफर शेख, पं.स. सदस्य जास्वंदा करंगामी, महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष प्रतिभा जुमनाके आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना चारूलता टोकस म्हणाल्या, काँग्रेसच्या सरकारने आपल्या कार्यकाळात सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक लोकाभिमुख योजना कार्यान्वित केल्या होत्या. मात्र भाजप सेना प्रणित युती सरकारने अनेक योजना गुंडाळण्याचा प्रयत्न चालविला आहे. अनेक योजनांचे नाव बदलवून काँग्रेस सरकारच्या काळातील जुन्या योजना अंमलात आणल्या जात आहे. गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत.
महिलांवरील अन्याय व अत्याचार रोखण्यात भाजपप्रणित सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. गडचिरोली जिल्ह्यात उद्योग धंदे नसल्याने पुरूषांसह महिलाही बेरोजगार झाल्या आहेत. काँग्रेसचे ध्येय, धोरण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून येत्या चार वर्षांत पक्ष संघटन मजबूत करावे, भाजप-सेना पक्षाची सत्ता आगामी काळात उलथवून टाकण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहनही टोकस यांनी यावेळी केले.
काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातील अनेक लोकाभिमुख योजनेचा लाभ सर्वसामान्य व गरीब नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असा सल्लाही टोकस यांनी महिला कार्यकर्त्यांना दिला. यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, सगुना तलांडी व मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, संचालन अर्चना जनगनवार यांनी केले. कार्यक्रमाला महिला काँग्रेसच्या चामोर्शी तालुकाध्यक्ष मंदा तुरे, आरमोरी तालुकाध्यक्ष मंगला कोवे, अहेरीच्या तालुकाध्यक्ष सविता आत्राम, गडचिरोलीच्या तालुकाध्यक्ष ज्योती गव्हाने, लता ढोक, रोशना शिंपी, जया बांबोळे, पद्मा पसुला आदीसह बहुसंख्य कार्यकर्त्या उपस्थित होत्या. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Try to increase the organization of women's Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.