बुरड व्यवसाय संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 23:54 IST2018-04-05T23:54:53+5:302018-04-05T23:54:53+5:30
गतवर्षीच्या तुलनेत यंदा हिरव्या बांबूच्या दरात वाढ करण्यात आली असून दर आठवड्याला बांबूचा डेपोमध्ये पुरवठा होत नसल्याने तालुक्यातील बुरड समाजाचा पारंपरिक व्यवसाय संकटात सापडला आहे.

बुरड व्यवसाय संकटात
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : गतवर्षीच्या तुलनेत यंदा हिरव्या बांबूच्या दरात वाढ करण्यात आली असून दर आठवड्याला बांबूचा डेपोमध्ये पुरवठा होत नसल्याने तालुक्यातील बुरड समाजाचा पारंपरिक व्यवसाय संकटात सापडला आहे. त्यामुळे हिरव्या बांबूचे दर कमी करून न्याय द्यावा, अशी मागणी बुरड कामगारांनी केली आहे.
यासंदर्भात वन विभागाच्या क्षेत्रसहायकामार्फत मुख्य वनसंरक्षकांकडे निवेदन पाठविण्यात आले आहे. पं.स. सदस्या वृंदा गजभिये यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, आरमोरी शहरातील व तालुक्यातील बुरड समाज हा बांबूपासून साहित्य तयार करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. मात्र शासनाने पूर्वीच्या तुलनेत आता हिरव्या बांबूचे दर प्रचंड वाढविले आहे. हिरव्या बांबूचे दर २५ रूपयांपेक्षा अधिक असल्याने बुरड कामगारांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. याचे कारण बांबूपासून तयार करण्यात आलेल्या सूप, टोपल्या, परडे व इतर साहित्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे वनविभागाने हिरव्या बांबूचे दर कमी करावे, बुरड वहिवाटीसाठी लागू असलेली जात प्रमाणपत्राची अट शिथील करावी, अशी मागणी केली आहे. निवेदन देताना दिलीप घोडाम, अशोक नागापुरे, मधुकर हिरापुरे, सुभाष गराडे, लक्ष्मण नागपुरे यांच्यासह बुरड कामगार हजर होते.