आदिवासी धर्म समतेचा पुरस्कर्ता
By Admin | Updated: November 19, 2016 01:56 IST2016-11-19T01:56:19+5:302016-11-19T01:56:19+5:30
निसर्गधर्म केवळ आदिवासी बांधव स्वीकारत असले तरी या सोहळ्यासाठी सर्वच धर्मातील नागरिकांना पाचारण करण्यात आले आहे.

आदिवासी धर्म समतेचा पुरस्कर्ता
श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन : दिभना (माल) येथे निसर्ग धर्माचा स्वीकार कार्यक्रम
गडचिरोली : निसर्गधर्म केवळ आदिवासी बांधव स्वीकारत असले तरी या सोहळ्यासाठी सर्वच धर्मातील नागरिकांना पाचारण करण्यात आले आहे. यातून नवा आदर्श निर्माण झाला आहे. सर्व धर्मांप्रती आदर व्यक्त होत असून प्रबळ राष्ट्रभावनाही प्रगट होते. या धर्मातून मानवतेला एक नवा संदेश प्राप्त होईल, असा आशावाद ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केला.
गडचिरोली तालुक्यातील दिभना (माल) येथे आदिवासी धर्म/निसर्गधर्म प्रस्थापना (निसर्गधर्म स्वीकार) समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. श्रीपाल सबनिस यांनी विचार व्यक्त केले. वृक्षपूजा आणि आदिवासी धर्माच्या ध्वजारोहणाने या कार्यक्रमाला सुरूवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. विनायक तुमराम होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जैन साहित्याचे अभ्यासक जैनाचार्य पंडीत डॉ. राकेश शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून फादर डॉ. अॅन्थोनी डीसूजा, शिख धर्माचे धर्मगुरू मिल्कीतसिंग बल, सुफी साहित्याचे अभ्यासक डॉ. मोहम्मद आझम, शिवधर्म संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर, गुजरात येथील आदीधर्म समितीचे अध्यक्ष लालूभाई वसावा, आदिवासी महासंघाचे अध्यक्ष डॉ. भरत वळवी, देवरीचे माजी आमदार रामरतनबापू राऊत, भरत दूधनाद, वाहरू सोनवने, सुनील कुमरे आदी मान्यवर उपस्थित होते.
धर्मगुरू पहांदी पारी कुपारलिंगो हिरासुका पाटाडी, भगवान बिरसा मुंडा, गुलाम महाराज, संत मुंगसूजी महाराज यांच्या प्रतिमांसह छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शहीद वीर बाबूराव शेडमाके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिवीर नारायणसिंह उईके यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. संस्था अध्यक्ष आणि संयोजक प्रा. डॉ. विनायक तुमराम यांनी उपस्थित समुहाला १६ प्रतिज्ञा दिल्या. उपस्थित समुदायाने हात समोर करून या प्रतिज्ञा ग्रहण केल्या. त्यानंतर डॉ. तुमराम यांच्या ‘आदिवासी और उनका निसर्गधर्म’ तसेच पी. डी. कांबळे यांच्या ‘मुक्ती कोन पथे’ या आदिवासी धर्म तत्वज्ञानावरील पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना श्रीपाल सबनिस म्हणाले की, प्रकृतीमध्ये समानता आहे. या तत्वाशी मी सहमत नाही. निसर्गातून येणाऱ्या विविध आपत्तींमुळे गरीब विस्थापीत होत असल्याने याला समता म्हणता येत नाही. प्रभू येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर, गुरूनानक यांच्या जीवन कार्यावरही त्यांनी प्रकाश टाकत त्यांच्या स्नेहसमत्व दृष्टीचा आणि मानवतावादाचा पुरस्कार केला. या धर्म सोहळ्याच्या आयोजनाने डॉ. विनायक तुमराम यांनी नवा आदर्श प्रस्तुत केला असल्याचेही ते म्हणाले.
पुरूषोत्तम खेडेकर म्हणाले की, शिवधर्माच्या स्थापनेनंतर या धर्माचा सतत प्रचार व प्रसार आम्ही करीत आहोत. लोकसंख्येचा आम्ही कधीच विचार केला नाही. आदिवासी धर्माच्या लोकांनी देखील आपल्या मागे किती लोक आहेत. याचा विचार न करता आपले कार्य पुढे सुरू ठेवावे, शिवधर्म व मराठा सेवा संघ सदैव या धर्माच्या पाठीशी राहिल, असे मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक संस्था सचिव सुनील कुमरे तर आभार वनिश्याम येरमे यांनी मानले. दामू ठाकरे व भीमसिंग पवार यांच्या लोकगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. रात्री ‘आदिवासी संस्कृती दर्शन’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या समारंभाला आदिवासी बांधवांसह इतर धर्माचेही नागरिक उपस्थित होते.