व्यापाऱ्यांकडून खरेदी बंद; शेतकरी अडचणीत
By Admin | Updated: December 3, 2015 01:41 IST2015-12-03T01:41:07+5:302015-12-03T01:41:07+5:30
शेतकऱ्यांचा धानमाल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात खरेदी करण्यात यावा, असा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने देऊन...

व्यापाऱ्यांकडून खरेदी बंद; शेतकरी अडचणीत
नोटीस बजावून खुलासा नाही : परवानाअटीचे व्यापाऱ्यांकडून झाले उल्लंघन
वैरागड : शेतकऱ्यांचा धानमाल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात खरेदी करण्यात यावा, असा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने देऊन यासंदर्भात परवानाधारक सर्व खासगी व्यापाऱ्यांना नोटीस बजाविण्यात आल्या होत्या. मात्र परवाना अटीचे उल्लंघन झाल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने खासगी व्यापाऱ्यांची धान खरेदी बंद केली आहे. त्यामुळे शेतकरी धान विक्रीसाठी प्रचंड अडचणीत आले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती आरमोरी तसेच उपबाजार असलेल्या देसाईगंज, कुरखेडा, कोरची व वडधा येथील आवारात शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी व विक्री व्हावी, असा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने घेतला होता.
सन २०१५-१६ या वर्षात कृषी उत्पन्न बाजार समितीचे परवानाधारक व्यापाऱ्यांनी संबंधित बाजार समितीच्या क्षेत्रात येणारे शेतकऱ्यांचा खरेदी केलेला माल बाजार समितीतच खरेदी करावा, याबाबत परवानाधारक व्यापाऱ्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र या सूचनांचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात येताच खरेदी-विक्रीचे व्यवहार अधिनियम १९६३ च्या कलम ६ अन्वये बाजार समिती प्रशासनाने व्यापाऱ्यांची ढोक धान खरेदी बंद केली. यामुळे शेतकऱ्यांची धानविक्रीसाठी प्रचंड अडचण झाली आहे. अनेक शेतकरी दोन ते तीन पोते धान व्यापाऱ्यांना विकून आपला आर्थिक व्यवहार करीत होते. बाजार समितीच्या मुख्य बाजार तसेच उपबाजार आवारात विक्रीसाठी धान नेण्याकरिता शेतकऱ्यांकडे साधने नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी परवानाधारक व्यापाऱ्यांकडे आपले धान विक्रीसाठी नेले आहेत. मात्र परवानाधारक व्यापाऱ्यांनी आपले धान खरेदी बंद ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचा धानमाल तसाच पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढत आहे. अनेक शेतकऱ्यांना थंडीच्या दिवसात आपल्या धान्यांजवळ रात्री थांबावे लागत आहे.