१ हजार ६३ विद्यार्थी देणार दहावीची पुनर्परीक्षा
By Admin | Updated: July 20, 2015 01:53 IST2015-07-20T01:53:24+5:302015-07-20T01:53:24+5:30
दहावीची पुनर्परीक्षा २१ जुलैपासून सुरूवात होत असून जिल्ह्यातील १ हजार ६३ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. त्यानुसार माध्यमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे.

१ हजार ६३ विद्यार्थी देणार दहावीची पुनर्परीक्षा
तीन भरारी पथके : मंगळवारपासून परीक्षेला होत आहे प्रारंभ
गडचिरोली : दहावीची पुनर्परीक्षा २१ जुलैपासून सुरूवात होत असून जिल्ह्यातील १ हजार ६३ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. त्यानुसार माध्यमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे.
दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी पहिल्यांदाच राज्यभरात जुलै महिन्यात परीक्षा घेतली जात आहे. परीक्षेला २१ जुलैपासून प्रारंभ होत असून ५ आॅगस्ट रोजी ही परीक्षा संपणार आहे. त्यानंतर अगदी १५ दिवसात या परीक्षेचा निकाल जाहीर करून यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकराव्या वर्गामध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १ हजार ६३ विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षेचे अर्ज केले. या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. परीक्षेदरम्यान होणाऱ्या कॉपीला आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी व डायटचे प्राचार्य यांच्या नेतृत्त्वात तीन भरारी पथक नेमले आहेत. (नगर प्रतिनिधी)
सहा परीक्षा केंद्र
परीक्षार्थींची संख्या कमी असल्याने शिक्षण विभागाने तालुकास्तरावर केवळ सहा परीक्षा केंद्रांची निर्मिती केली असून या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे. सदर परीक्षा केंद्र सिरोंचा, अहेरी, चामोर्शी, गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज या ठिकाणी आहेत. म्हणजेच दोन तालुक्यांसाठी एक परीक्षा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. हे जरी मान्य केले तरी जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून शिक्षण विभागाने प्रत्येक तालुकास्तरावर केंद्र देणे गरजेचे होते. अशी अपेक्षा पालकवर्गाकडून होत आहे.