तीन ट्रक साहित्य भामरागड पूरग्रस्तांसाठी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST2019-09-11T06:00:00+5:302019-09-11T06:00:36+5:30
यावर्षीच्या अतिवृष्टीने गडचिरोली जिल्ह्यात कहर केला. पुराचा सर्वाधिक फटका भामरागड तालुक्याला बसला. जवळपास सात ते आठ वेळा भामरागडात पाणी शिरले होते. त्यामुळे शेकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले. आपल्याच जिल्ह्यात संकट आले असताना त्यांना मदत न करता इतरांना मदत करणे चुकीचे ठरेल, ही बाब विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात आली.

तीन ट्रक साहित्य भामरागड पूरग्रस्तांसाठी रवाना
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या रासेयो विभागाने सातारा, सांगली, कोल्हापूरपूरग्रस्तांसाठी १५ दिवसांपूर्वी मदत गोळा केली होती. मात्र भामरागड तालुक्यातच पुरामुळे मोठे नुकसान झाल्याने सदर मदत भामरागड पूरग्रस्तांसाठी रवाना करण्यात आली. जिल्हाधिकारी शेखर यांनी वाहनांना हिरवी झेंडी दाखविली. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते.
यावर्षीच्या अतिवृष्टीने गडचिरोली जिल्ह्यात कहर केला. पुराचा सर्वाधिक फटका भामरागड तालुक्याला बसला. जवळपास सात ते आठ वेळा भामरागडात पाणी शिरले होते. त्यामुळे शेकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले. आपल्याच जिल्ह्यात संकट आले असताना त्यांना मदत न करता इतरांना मदत करणे चुकीचे ठरेल, ही बाब विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात आली. विद्यापीठाने सातारा, सांगली पूरग्रस्तांसाठी मदत गोळा केलीच होती. हीच मदत भामरागड पूरग्रस्तांना पाठविण्यात आली आहे. कपडे, दैनंदिन साहित्य, जीवनोपयोगी वस्तूंनी भरलेले सुमारे तीन ट्रक भामरागडकडे रवाना झाले आहेत. कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर, प्र-कुलगुरू डॉ. ईश्वर मोहुर्ले, रासेयो संचालक डॉ. महेश मडावी, जिल्हा समन्वयक डॉ. नरेंद्र आरेकर, डॉ. विजया गेडाम यांच्या मार्गदर्शनात सुमारे ६५ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सदर मदत गोळा केली होती.
येथील अबोल आदिवासी स्वत:च्या दु:खाचा देखावा करू शकत नसले म्हणून त्यांचे दु:ख निश्चितच कमी नाही. विद्यापीठाप्रमाणे जिल्हाभरातील शाळा व सामान्य नागरिकांनी सुध्दा मदतीसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.