१४६४ जागांसाठी तीन हजार उमेदवार निवडणूक रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:58 IST2021-01-08T05:58:32+5:302021-01-08T05:58:32+5:30
गडचिरोलीसह आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची आणि धानोरा या सहा तालुक्यांमधील १९९ ग्रामपंचायतींमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणूक होत आहे. या ग्रामपंचायतींमधील ...

१४६४ जागांसाठी तीन हजार उमेदवार निवडणूक रिंगणात
गडचिरोलीसह आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची आणि धानोरा या सहा तालुक्यांमधील १९९ ग्रामपंचायतींमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणूक होत आहे. या ग्रामपंचायतींमधील १४६४ जागांसाठी ३२६३ उमेदवारांचे नामांकन वैध ठरले होते. दरम्यान, सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक रिंगणातून माघार घेण्याची मुदत होती. त्यानंतर लगेच निवडणुकीच्या रिंगणात कायम असलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप करायचे होते. याशिवाय अविरोध निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करायची होती. ही सर्व कसरत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सहाही तहसील कार्यालयात सुरू होते. ग्रामीण भागातील उमेदवार आणि त्यांचे समर्थक संबंधित तहसील कार्यालयाच्या प्रांगणात निवडणूक चिन्ह कोणते मिळते याची प्रतीक्षा करीत होते. मंगळवारपासून उमेदवारांच्या चिन्हासह प्रचाराला सुरुवात होईल. प्रचारासाठी जेमतेम एक आठवडा मिळणार आहे.
दरम्यान, दुर्गम भागातील काही ग्रामपंचायतींमध्ये एकही नामांकन आले नाही. त्यात धानोरा तालुक्यातील कुलभट्टी आणि कटेझरी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ही गावे नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील भागात आहेत.
अनेक उमेदवारांची अविरोध निवड
सहा तालुक्यातील अनेक गावांमध्ये एका जागेसाठी एकाच उमेदवाराचा अर्ज आला, तर काही ठिकाणी इतर उमेदवारांनी माघार घेतल्याने रिंगणात एकच उमेदवार शिल्लक आहे. अशा सर्व उमेदवारांची अविरोध निवड होणार आहे. त्यांची यादी बनविण्याचे काम संबंधित तहसील कार्यालयात रात्री सुरू होते.
धानोरात १२ तर गडचिरोलीत ३ ग्रामपंचायती अविरोध
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील अविरोध निवड होणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी १५ लाखाचा विकास निधी देण्याची घोषणा आ.डॉ.देवराव होळी यांनी केली होती. त्यानुसार या मतदार संघात धानोरा तालुक्यातील दराची, देवसूर, गिरोला, रेखाटोला, कुथेगाव, कोंदावाही, निमगाव, सावंगा बुज. मोहगाव, चिचोळा, हेटी आणि कामनगड या १२ तर गडचिरोली तालुक्यातील मारदा, हिरापूर आणि मरेगाव या ३ ग्रामपंचायतींमधील सर्व सदस्य अविरोध निवडले जात आहेत.
(बॉक्स)
महिलांवर्ग जोशमध्ये, दारूला आळा
निवडणुकांमध्ये मतदारांना दारूचा पुरवठा करून आपल्याकडे वळविण्याचा उमेदवारांचा कल असतो. पण आता ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे उमेदवार महिला आपल्या प्रभागात दारूच्या वाटपाला सहकार्य करणार नाही. गावातील महिला संघटनाही त्याला विरोध करतील. त्यामुळे या निवडणुकीत दारूचा वापर कमीतकमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने हातभट्ट्यांवरील कारवायाही वाढविल्या आहेत.
कोट