झाडावर चढून डबले कुटुंबातील तिघांनी वाघापासून वाचविले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:01 IST2020-04-25T05:00:00+5:302020-04-25T05:01:19+5:30
गणेशपूर येथील अमोल विठ्ठल डबले, त्यांची १२ वर्षांची मुलगी व पत्नी हे तिघे जण शुक्रवारी सकाळी मोहफूल वेचण्यासाठी जंगलात गेले होते. मोहफूल वेचत असताना जंगलातील माकडे ओरडण्यास सुरूवात केली. त्यामुळे डबले कुटुंब सावध झाले. दरम्यान आपल्या दिशेने वाघ येत असल्याचे अमोल डबले यांच्या मुलीला दिसून आले. वाघापासून प्राण वाचविण्यासाठी तिघेही जण झाडावर चढले. जवळपास तासभर ते झाडावरच चढून होते.

झाडावर चढून डबले कुटुंबातील तिघांनी वाघापासून वाचविले प्राण
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी तालुक्यातील गणेशपूर येथील महिला सिंधूबाई ऋषी बोरकुटे या वाघाच्या हल्ल्यात शुक्रवारी सकाळी ठार झाल्या. याच वाघापासून गणेशपूर येथील अमोल विठ्ठल डबले यांच्या कुटुंबातील तिघाजणांनी झाडावर चढून स्वत:चे प्राण वाचविले.
गणेशपूर येथील अमोल विठ्ठल डबले, त्यांची १२ वर्षांची मुलगी व पत्नी हे तिघे जण शुक्रवारी सकाळी मोहफूल वेचण्यासाठी जंगलात गेले होते. मोहफूल वेचत असताना जंगलातील माकडे ओरडण्यास सुरूवात केली. त्यामुळे डबले कुटुंब सावध झाले. दरम्यान आपल्या दिशेने वाघ येत असल्याचे अमोल डबले यांच्या मुलीला दिसून आले. वाघापासून प्राण वाचविण्यासाठी तिघेही जण झाडावर चढले. जवळपास तासभर ते झाडावरच चढून होते. वाघ दूर गेल्याची खात्री केल्यानंतर ते झाडावरून उतरले व धावत गणेशपूर येथे आले. त्यानंतर वाघ आल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली. त्याचवेळी सिंधू बोरकुटे यांच्या कुटुंबियांनी सिंधू ही सुध्दा त्याच परिसरात मोहफूल वेचण्यासाठी गेली आहे, असे सांगितले. वन विभागाचे पथक व गावकऱ्यांनी त्या परिसराचा शोध घेतला असता सिंधू वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याचे दिसून आले.
या परिसरात मागील महिनाभरापासून वाघाची दहशत आहे. त्यामुळे नागरिकांनी मोहफूल वेचण्यास जाऊ नये, असे आवाहन वन विभागामार्फत केले जात आहे.
सिंधूबाई यांच्या कुटुंबाला २५ हजार रुपयांची मदत
वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या सिंधूबाई ऋषी बोरकुटे यांच्या कुटुंबाला वन विभागामार्फत २५ हजार रुपयांची सानुग्रह मदत देण्यात आली. आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला. यावेळी गजबे यांनी रूग्णालयात जाऊन मृतकाच्या नातेवाईकांची विचारपूस करून सांत्वन केले. वडसाचे उपवनसंरक्षक निरंजन विवरेकर, सहायक वनसंरक्षक भास्कर कांबळे, गोपाल धोंडगे, आरमोरीचे आरएफओ सचिन डोंगरवार, पोर्लाचे आरएफओ एम. पी. चांगले, देसाईगंजचे आरएफओ आर. एम. शिंदे, वन्यजीव वन आरएफओ हिनवते व फिरते पथक तसेच पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. जंगलात जाऊ नये, असे आवाहन वन अधिकाºयांनी गावातील नागरिकांना केले.