तीन लाखांवर मलेरिया तपासणी किट उपलब्ध
By Admin | Updated: June 25, 2015 01:52 IST2015-06-25T01:52:39+5:302015-06-25T01:52:39+5:30
गतवर्षी २०१४ मध्ये प्रभावीपणे हिवताप तपासणी मोहीम राबविल्यामुळे जिल्ह्यात २४ हजार ४५९ रुग्ण मलेरिया पॉझिटीव्ह आढळून आले होते.

तीन लाखांवर मलेरिया तपासणी किट उपलब्ध
गडचिरोली : गतवर्षी २०१४ मध्ये प्रभावीपणे हिवताप तपासणी मोहीम राबविल्यामुळे जिल्ह्यात २४ हजार ४५९ रुग्ण मलेरिया पॉझिटीव्ह आढळून आले होते. यंदा हिवतापावर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी फवारणी, जनजागृती, गृहभेटी आदी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शासनाकडून जिल्ह्याला मलेरिया तपासणीच्या एकूण ३ लाख १० हजार आरडीके किट उपलब्ध झाले असून सर्व रुग्णालयात तसेच आशा वर्करमार्फत मलेरिया रुग्णाचे पाच मिनीटात निदान होणार आहे. हिवतापाला नियंत्रीत करण्यासाठी २५२ कर्मचाऱ्यांमार्फत गावागावात फवारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
२००१ पासून २०१४ पर्यंतच्या १४ वर्षांच्या कालावधीत हिवताप रुग्णांची आकडेवारी पाहता जिल्ह्यात एटापल्ली, धानोरा, भामरागड व अहेरी आदी चार तालुके हिवताप रुग्णांच्या बाबतीत अतिसंवेदनशील आहे. या चार तालुक्यातच ७० टक्के मलेरिया पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत या चार तालुक्यांवर लक्ष केंद्रीत केले असून यंदा २०१५ वर्षात यापुढे हिवतापाने एकही मृत्यू होणार नाही, यासाठी आरोग्य विभाग पूर्णपणे दक्ष राहील, असेही डॉ. कमलेश भंडारी यांनी यावेळी सांगितले.
हिवतापावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील १६६१ गावांपैकी १ हजार ३७६ गावांमध्ये डासांची घनता कमी करण्यासाठी लेम्डासायहॅलोथ्रीन या नव्या कीटकनाशक औषधीची फवारणी कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. ज्या तालुक्यात हिवतापाची लागण होण्याची शक्यता आहे, अशा तालुक्यापासून २५ जूनपासून घराघरात कीटकनाशकाची फवारणी करण्यात येणार आहे. याशिवाय सर्व आरोग्य कर्मचारी गावात नियमित गृहभेटी देऊन सर्वेक्षण करणार आहे. तसेच जनजागृतीही करण्यात येणार आहे.
फवारणीदरम्यान नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा संकोच न करता स्वयंपाक खोली, देवघरापासून संपूर्ण घरात फवारणी करू द्यावी, जेणेकरून डासांचा प्रादुर्भाव होणार नाही. तसेच फवारणी संदर्भात काही तक्रारी असल्यास नागरिकांनी थेट तालुका व जिल्हास्तरावर तक्रारी कराव्यात, जेणेकरून पुन्हा फवारणीचा कार्यक्रम राबविता येईल, असेही डॉ. भंडारी यावेळी म्हणाले. पत्रकार परिषदेला जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रवींद्र ढोले आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)