चामोर्शी-घोट मार्गावर काटेरी झुडपे वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:34 IST2021-02-07T04:34:08+5:302021-02-07T04:34:08+5:30

सोनसरी भागात मोबाईल सेवा कुचकामी कुरखेडा : तालुक्यातील सोनसरी, उराडी परिसरात बीएसएनएलची भ्रमणध्वनी व दूरध्वनी सेवा पूर्णत: ठप्प ...

Thorns grew on the Chamorshi-Ghot road | चामोर्शी-घोट मार्गावर काटेरी झुडपे वाढली

चामोर्शी-घोट मार्गावर काटेरी झुडपे वाढली

सोनसरी भागात मोबाईल सेवा कुचकामी

कुरखेडा : तालुक्यातील सोनसरी, उराडी परिसरात बीएसएनएलची भ्रमणध्वनी व दूरध्वनी सेवा पूर्णत: ठप्प झाली आहे. बीएसएनएलच्या भोंगळ कारभारामुळे ऑनलाईन कामे प्रभावित होत आहेत. विविध दाखले तसेच प्रमाणपत्र ऑनलाईन काढावे लागतात. यासाठी इंटरनेट सेवा योग्य असणे आवश्यक आहे.

योजनांच्या माहितीसाठी कायमस्वरूपी केंद्र द्या

जोगीसाखरा : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहितीअभावी नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. दुर्गम भागातील नागरिकांना विविध योजनांची माहिती मिळत नाही. त्यामुळे तालुकास्तरावर कायमस्वरूपी योजनांची माहिती देणारे कार्यालय द्यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

डुक्कर पकडण्याची मोहीम थंडावली

गडचिरोली : गेल्या काही दिवसापासून गडचिरोली शहरातील सर्व २३ वॉर्डात डुकरांचा हैदोस प्रचंड वाढला आहे. मात्र पालिकेच्या वतीने डुकरांच्या बंदोबस्ताकरिता काही महिन्यापूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम थंडबस्त्यात असल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाचे डुकराच्या हैदोसाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. नगर परिषदेने मागील वर्षी डुक्कर पकडण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे डुकरांची संख्या कमी झाली होती. मात्र पुन्हा डुकरांची संख्या वाढली आहे.

एटापल्लीत राष्ट्रीयीकृत बँकेची आवश्यकता

एटापल्ली : एटापल्ली हा विस्ताराने अतिशय मोठा तालुका आहे. या तालुक्यात सुमारे १९८ गावे आहेत. केवळ कसनसूर व एटापल्ली या दोनच ठिकाणी बँका आहेत. एटापल्ली येथे एसबीआय, सहकारी बँक व ग्रामीण बँकेची शाखा आहे. तालुक्याच्या विस्ताराच्या तुलनेत बँकांची संख्या कमी आहे. त्यामुळे अजूनही बहुतांश नागरिकांना बँकेचे आर्थिक व्यवहार माहीत नाही.

लोंबकळणाऱ्या तारांमुळे वाढला धोका

कुरखेडा : तालुक्यातील पलसगड, पुराडा भागातील मुख्य रस्त्याला लागून असलेल्या विजेच्या तारा लोंबकळत आहेत. तारांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मात्र वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्षच आहे.

शासकीय निवासस्थाने झाली ओसाड

आलापल्ली : शासनाने लाखो रुपये खर्च करून येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधून घेतली. मात्र शासकीय कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने कर्मचाऱ्यांना देखभालीअभावी ही निवासस्थाने ओसाड झाली आहेत. येथील अनेक वन कर्मचाऱ्यांच्या इमारती ओसाड दिसून येतात.

रांगी गावालगत गतिरोधक निर्माण करा

रांगी : येथील बसथांब्यापासून मोहलीकडे जाणाऱ्या मार्गावर गतिरोधक उभारणे आवश्यक आहे. गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव वेगाने हाकली जातात. या मार्गावर अपघाताची शक्यता बळावली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन रखडले

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान मोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील पशुमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्यपशुूचे अनेक हल्ले नागरिकांवर झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत असतानाही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

मोहझरीतील रस्त्यावर खड्डेच खड्डे

गडचिरोली : तालुक्यातील मोहझरी गावातील रस्त्याची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे. सदर रस्ते दुरुस्त करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. मोहझरी गावातील मुख्य मार्ग डांबरीकरणने बनला आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

अरततोंडी देवस्थानात सुविधा द्या

जोगीसाखरा : हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले अरततोंडी येथील महादेव देवस्थान आजही उपेक्षितच आहे. राज्य शासन पर्यटनस्थळांच्या विकासासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे. परंतु येथील प्राचीन महादेव देवस्थानाचा विकास झाला नाही. येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा मिळणे आवश्यक आहे. महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरत असल्याने भाविकांची गर्दी असते. मात्र येथे भाविकांसाठी पुरेशा सुविधा नसल्यामुळे त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

केंद्रांअभावी नागरिकांची पायपीट

कोरची : तालुका भौगोलिक विस्ताराने लहान आहे. परंतु तालुक्यात अनेक गावे आहेत. लोकांसाठी निर्माण करण्यात आलेले महा-ई-सेवा केंद्र अपुरे आहेत. नागरिकांना ६० ते ७० किमीचे अंतर कापावे लागते. त्यामुळे महा-ई-सेवा केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महा-ई-सेवा केंद्रामुळे लोकांना दाखले मिळणार असले तरी ही सेवा इंटरनेट कनेक्टिव्हीटवर अवलंबून आहे. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हीटीची समस्या वारंवार उद्भवते. त्यामुळे दाखले देण्याची ऑफलाईन सुविधासुद्धा सुरू ठेवावी.

अरुंद रस्त्यामुळे अपघाताचा धोका

अहेरी : येथील मुख्य मार्ग अरुंद असल्याने दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यानंतर इतर वाहने जाण्यासाठी मार्ग राहत नाही. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. उपविभागातील अहेरी हे महत्त्वाचे शहर आहे. अनेक कार्यालये या ठिकाणी असल्याने ग्रामीण व दुर्गम भागातील जनता विविध कामासाठी अहेरीत येत राहते. अहेरी शहरातील गांधी चौकातील मुख्य मार्ग अरुंद आहे. याच ठिकाणी बसथांबा आहे. दोन बस समोरासमोर आल्यानंतर इतर वाहनांना जागा राहत नाही. परिणामी अपघाताचा धोका आहे.

चामोर्शीत बांधकाम साहित्य रस्त्यावर

चामोर्शी : शहरातील विविध भागात घराचे बांधकाम सुरू असून, बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. बांधकाम साहित्य हटविण्याची मागणी आहे.

सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटरी उपलब्ध करा

आष्टी : विद्युत वाचविण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटरी चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे सौरदिवे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. त्यामुळे नव्याने बॅटरी द्याव्यात, अशी मागणी आहे.

कोरची शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला

कोरची : शहरातील विविध वॉर्डात अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजारी लोकांची संख्या वाढत चालली आहे.

रस्त्यावरच उतरवितात माल

देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या देसाईगंज शहरात बाहेरगावाहून ट्रकांद्वारे विविध प्रकारचा माल आणला जातो. याशिवाय याच मार्गाने बाहेर अवजड वाहनांचे आवागमन सुरू असते. परंतु यातच मुख्य मार्गावर मोठमोठे ट्रक उभे करून रस्त्यावरच माल उतरविला जातो. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो.

अनेक कामांवर कुशल मजुरांचा तुटवडा

कुरुड : विविध प्रकारची कामे करताना बांधकाम करण्यासाठी कुशल मजुरांची आवश्यकता आहे. मात्र कुशल मजुरांची कमतरता जाणवत आहे. परिसरातील अनेक गावांमध्ये दरवर्षी कुशल कामगारांचा तुटवडा जाणवत आहे.

Web Title: Thorns grew on the Chamorshi-Ghot road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.