जनजागरण मेळाव्यातून लाच विरोधात जनजागृती होणार
By Admin | Updated: September 9, 2014 23:29 IST2014-09-09T23:29:17+5:302014-09-09T23:29:17+5:30
गडचिरोली जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण अतिशय कमी आहे. तसेच दक्षिण व उत्तर गडचिरोली भागाच्या काही तालुक्यातील दुर्गम भागात नागरिकांमध्ये शासकीय कामासाठी लाच घेण्याच्या प्रकरणात तक्रारींचे

जनजागरण मेळाव्यातून लाच विरोधात जनजागृती होणार
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण अतिशय कमी आहे. तसेच दक्षिण व उत्तर गडचिरोली भागाच्या काही तालुक्यातील दुर्गम भागात नागरिकांमध्ये शासकीय कामासाठी लाच घेण्याच्या प्रकरणात तक्रारींचे प्रमाणही कमी आहे. ही बाब लक्षात घेऊन गडचिरोली जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस तसेच जिल्हा प्रशासनाच्या जनजागरण मेळाव्यातून लाचविरोधात जनजागृती करणार आहेत, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर विभागीय पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी दिली.
गडचिरोली येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते म्हणाले की, आपण उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून अहेरी येथे २००७ मध्ये काम केले आहे. या भागातील भौगोलिक परिस्थितीची आपल्याला जाणीव आहे. नागरिकांमध्ये सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुढाकार घेणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याने दुर्गम भागातील लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे फोन नंबर व मोबाईल नंबर तसेच टोल फ्री नंबर असलेले फलक लावण्याबाबतही संबंधित कार्यालयांना लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यात जनजागरण मेळावे मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात. या मेळाव्यातही लाच संदर्भात जनजागृती करणारे फलक लावण्याचे काम आगामी काळात केले जाणार आहे. भ्रष्टाचाराविरोधातील तक्रारींची संख्या वाढावी यासाठी हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय अलिकडेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ‘स्टाप करप्शन सेव्ह नेशन’ ही मोहीम सुरू केली असून या अंतर्गत १०६४ हा टोल फ्री नंबरही नागरिकांना देण्यात आला आहे. नागरिकांनी यावर तक्रारी कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे. या कामासाठी काही स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेण्याचा विभागाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय जनजागृतीसाठी अन्य माध्यमांचाही वापर केला जाणार असल्याचे ते म्हणाले. न्यायालयातही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संबंधीत प्रकरणात शिक्षेचे प्रमाण आता वाढले आहे. तक्रारीही लोक जागृतीमुळे अधिक प्रमाणात येऊ लागल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)