पोलिसांकडून कारवाई नाही
By Admin | Updated: July 14, 2014 23:59 IST2014-07-14T23:59:20+5:302014-07-14T23:59:20+5:30
६ जुलै रोजी नाजुकराव सेलोटे व त्यांचा मुलगा विलास सेलोटे यांनी आपल्यासोबत काही लोकांना घेऊन माझ्या घरावर बळजबरीने हल्ला केला. अंगणात ठेवलेली तणस, गिट्टी, रेती, मुरूम व तारेचे

पोलिसांकडून कारवाई नाही
घरावर हल्ला प्रकरण : सुकरू गौरकार यांची पत्रपरिषदेत माहिती
गडचिरोली : ६ जुलै रोजी नाजुकराव सेलोटे व त्यांचा मुलगा विलास सेलोटे यांनी आपल्यासोबत काही लोकांना घेऊन माझ्या घरावर बळजबरीने हल्ला केला. अंगणात ठेवलेली तणस, गिट्टी, रेती, मुरूम व तारेचे कुंपन व शौचालयाची नासधूस केली. जागेवर ताबा मिळविण्यासाठी त्यांनी आपल्यावर दबाव आणला. याबाबतची तक्रार गडचिरोली पोलीस ठाण्यात त्याच दिवशी केली. मात्र या प्रकरणी पोलिसांनी संबंधित हल्ला करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली नाही, अशी माहिती सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत सुकरू गौरकार यांनी दिली.
या प्रकरणाबाबत माहिती देताना सुकरू गौरकार म्हणाले, आपण गेल्या ३५ ते ४० वर्षापासून कुरंझा (देशपूर) या गावी भूमापन क्रमांक ४५ च्या जागेवर स्वत:च्या राहत्या घरी वास्तव्य करीत आहे. ६ जुलै रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गावातीलच नाजुकराव सेलोटे व त्यांचा मुलगा विलास सेलोटे हे अन्य सहाजणांसोबत घराकडे आले. त्यांच्याकडे ट्रॅक्टर, सब्बल, पावडे व लाट्या-काट्या होत्या. माझ्या जागेवर राहत आहे, असे म्हणत त्यांनी घरासमोर अंगणात ठेवलेले तणीस, गिट्टी, रेती, मुरूम आदी साहित्य काढून टाकले. तसेच तारेचे कुंपन व शौचालयाची नासधूस केली. अंगणाच्या २० बाय ३० फुटाच्या जागेवर ट्रॅक्टरने खोदून खड्डा केला. या घटनेमुळे माझे संपूर्ण कुटुंबिय भयभित झाले आहे. हल्ला करणाऱ्यांकडून आम्हाला धमक्या मिळत आहेत. या घटनेची तक्रार करूनही गडचिरोली पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. माझ्यावर हल्ला करणाऱ्या सेलोटे कुटुंबिय व त्यांच्या साथीदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुकरू गौरकार यांनी केली.