पाणी पातळी दर्शविणारे १५ यंत्र नद्यांवर कार्यरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 23:54 IST2017-08-27T23:54:17+5:302017-08-27T23:54:40+5:30

पाणी पातळी दर्शविणारे १५ यंत्र नद्यांवर कार्यरत
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता या प्रमुख नद्यांसह अनेक लहान, मोठ्या नद्या आहेत. यापैकी १५ ठिकाणी पाण्याची उच्च पातळी दर्शविणारे यंत्र बसविण्यात आले आहे. संबंधित नदीने धोक्याची पातळी गाठताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने संबंधित भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जातो.
गडचिरोली जिल्ह्यात सुमारे १३०० मिमी पाऊस पडतो. जंगल अधिक असल्याने जंगलातील नदी, नाल्यांना लवकरच पूर येते. जिल्ह्यातील अनेक गावे नद्यांच्या काठी वसली आहेत. पुराचे पाणी गावात शिरल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात वित्त व मनुष्य हानी होण्याची शक्यता राहते. नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीच्या वर राहत असल्यास नागरिकांना सतर्क केले जाते. वेळीच उपाययोजना झाल्याने किमान जीवितहानी टाळण्यास फार मोठी मदत होत असल्याचे दिसून येत आहे.
या ठिकाणी बसवले आहेत यंत्र
कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा, देसाईगंज तालुक्यातील अरततोंडी, विसोरा, सिरोंचा तालुक्यातील मृदूकृष्णार, सोमनूर, अंकिसा, मोयाबिनपेठा, गडचिरोली तालुक्यातील कुरखेडा, चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा, अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली, गडअहेरी, दामरंचा, एटापल्ली तालुक्यातील हिंदूर, आरमोरी तालुक्यातील आरमोरी, देसाईगंज तालुक्यातील शिवणी या गावांमध्ये पाण्याची उच्च पातळी दर्शविणारे यंत्र बसविले आहे.