सुरसुंडीजवळील ठेंगणा पूल अडवितो मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:36 IST2021-04-18T04:36:28+5:302021-04-18T04:36:28+5:30
कुरखेडा : कुरखेडा-मुरूमगाव मार्गावरील सुरसुंडी-इरूपधोडरी गावादरम्यान असलेल्या नदीवरील कमी उंचीच्या पुलावरून पावसाचे पाणी वाहत असल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात हा मार्ग ...

सुरसुंडीजवळील ठेंगणा पूल अडवितो मार्ग
कुरखेडा : कुरखेडा-मुरूमगाव मार्गावरील सुरसुंडी-इरूपधोडरी गावादरम्यान असलेल्या नदीवरील कमी उंचीच्या पुलावरून पावसाचे पाणी वाहत असल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात हा मार्ग ठप्प होत असतो. काही नागरिक जीव मुठीत घालून पुढचा प्रवास करतात. सुरसुंडी गावाजवळून भेदरी नदी वाहते. या नदीवर ठेंगणा पूल बांधण्यात आला आहे. पावसाळ्यात थोडेअधिक पाणी पडल्यानंतर पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात होते. त्यामुळे वेळोवेळी वाहतूक ठप्प होत असते. कुरखेडा-मुरूमगाव मार्गावर सदर नदी आहे. पुलावरून वाहण्यास सुरुवात झाल्यानंतर या मार्गावरची वाहतूक ठप्प होते. सुरसुंडी, इरूपधोडरीसह इतर गावे प्रभावित होतात. या नदीवर उंच पूल बांधावा, अशी मागणी कायम आहे. मात्र, या मागणीकडे शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
सौरदिवे दुरुस्तीकडे दुर्लक्ष
चामोर्शी : वीजपुरवठा नसलेल्या दुर्गम गावांमध्ये सौरदिव्यांची व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात आली; परंतु, या सौरदिव्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष आहे. काही ठिकाणच्या सौरदिव्यांच्या बॅटरीची चोरी झाली, तर काही ठिकाणी सौर प्लेट लंपास करण्यात आल्या आहेत. सौरदिवे बसविण्यासाठी शासनाने केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. लखमापूर बोरी परिसरातील गावांमध्ये सौरदिवे दुर्लक्षित असून, सौरदिव्यांना झाडाझुडपांचा व वेलींचा वेढा आहे. सोबतच बॅटऱ्या लंपास झाल्या आहेत. दिव्यांचे खांबही गंजलेले असल्याने धोका निर्माण झाला आहे.
टिल्लूपंप जप्तीची मोहीम सुरू करा
गडचिरोली : उन्हाळा असल्याने पाण्यासाठी टिल्लूपंपांचा वापर वाढला आहे. नगर परिषदेतर्फे टिल्लूपंपधारकांवर कारवाई केली जात नसल्याने त्यांची हिंमत वाढत चालली आहे. त्यामुळे टिल्लूपंपाची संख्याही वाढत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे. नगर परिषदेने टिल्लूपंप पकडण्याची मोहीम सुरू करावी, अशी मागणी आहे. अनेक कुटुंबांकडे पाणी साठवून ठेवण्यासाठीचे साहित्य उपलब्ध नसल्याने अशा कुटुंबीयांची अल्प पाणीपुरवठ्यामुळे मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे टिल्लूपंप जप्तीची मोहीम राबवावी, अशी मागणी आहे.
आमगावच्या हेमाडपंती मंदिराचा विकास करा
आमगाव (म.) : तालुक्यापासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या आमगाव (म.) येथील हेमाडपंती मंदिर जीर्ण व दुरवस्थेत आहे. मात्र, याकडे पुरातत्व विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. येथील देवालय ऋषीची मूर्ती, शिवपिंड, नदी, अष्टविनायक, लक्ष्मी नारायण, शिवपार्वती शाईल, हत्ती, घोडे, हनुमान, महाकालीचे देवालय, खोदकामामध्ये सापडलेली नाणी, शिलालेख, टाकीच्या पायऱ्या आहेत. त्यामुळे या मंदिराचा विकास करावा, अशी मागणी होत आहे. चामोर्शी तालुक्यात आष्टी, चपराळा भाविकांचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे आहेत.
शहरात मोकाट डुकरांची संख्या वाढली
गडचिरोली : मागील वर्षी नगरपालिकेच्या वतीने डुकरांना पकडण्याची मोहीम पथकाद्वारे राबविण्यात आली होती. काही काळ मोकाट डुकरांच्या हैदाेसावर नियंत्रण मिळाले होते; परंतु आता ‘जैसे थे’ स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अनेक वॉर्डात मोकाट डुकरांचा हैदोस वाढला असल्याने डुकरांना पकडण्याची मोहीम पुन्हा राबवावी, अशी मागणी होत आहे. शहरातील विविध वॉर्डांत कळपाने लहान-मोठी डुकरे फिरत असतात. यामुळे लहान मुले, वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. अनेकदा ही डुकरे नागरिकांच्या अंगणात प्रवेश करून घाण पसरवितात.
अल्पवयीन चालकांकडे पोलिसांचे दुर्लक्ष
गडचिरोली : शहरात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन वाहनधारकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र, याकडे परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. वाहतूक पोलीस दुचाकी वाहन चालविण्याचा परवाना तपासत आहेत; पण खास अल्पवयीन चालकांकडे लक्ष केंद्रित केल्यास अनेक जण विनापरवाना वाहतूक करताना आढळतील. अशावेळी त्यांच्या पालकांवरही कारवाई होऊ शकते.
वाहतुकीची काेंडी
देसाईगंज : शहरातील वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेक जण आपले वाहन रस्त्याच्या कडेला लावत असल्याने काही भागामध्ये वाहतूक कोंडी नित्याचीच झाली. मार्ग काढताना नागरिक त्रस्त होत आहेत. ओव्हरलाेड वाहनांमुळे रहदारी विस्कळीत हाेत आहे.
दुर्गम गावे दुर्लक्षित
भामरागड : तालुक्यातील गावांच्या विकासाकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी रस्ते, पाणी, वीज, आदी सुविधांपासून ही गावे वंचित आहेत. विशेष म्हणजे, आजही गावात एसटीसुद्धा पोहोचली नाही. त्यामुळे किमान सुविधा पुरविण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रवासी निवाऱ्यांचा प्रस्ताव तयार करा
आरमाेरी : बहुतांश मोठ्या गावांमध्ये बस जाते; पण बसथांब्यावर प्रवासी निवारे नसल्याने नागरिकांचे हाल होतात. विद्यार्थ्यांना ताटकळत राहावे लागते. त्यामुळे प्रस्ताव तयार करून निवारे बांधावेत.
विटा व्यावसायिक धास्तावले
गडचिरोली : तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत विटा तयार करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. मजुरांकरवी विटा तयार करणे सुरू झाले असून, या विटांची भट्टी लावण्याच्या तयारीत पुरवठादार होते. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणात राहत असल्याने भट्टी लावण्याचे काम थांबविण्यात आले आहे. ढगाळ वातावरणामुळे विटा व्यावसायिक नुकसानीच्या भीतीने धास्तावले आहेत. जिल्ह्यात दरवर्षी विटांना मोठी मागणी असते.
मिरचीविना परतले हजारो मजूर
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील हजारो मजूर तेलंगणा राज्यात मिरची तोडण्याच्या कामासाठी गेले होते. कोरोना संचारबंदीच्या कालावधीत सरकारने निर्णय घेतल्याने हे मजूर जिल्ह्यात स्वगावी परतले. मात्र, दरवर्षीप्रमाणे त्यांनी सोबत वाळलेली लाल मिरची आणली नाही. संचारबंदीच्या काळात मजुरांच्या वाहतुकीची समस्या निर्माण झाल्याने शेवटच्या तोड्याची मिरची या मजुरांना आपल्या गावाकडे आणता आली नाही. परिणामी एक ते दीड महिना मिरची तोडणीचे काम करूनसुद्धा या मजुरांना आता बाजारातून मिरची घ्यावी लागणार आहे.
पेंढरी येथे गॅस एजन्सीची गरज
धानोरा : वनविभागामार्फत संयुक्त वनव्यवस्थापनाचे सदस्य व जंगल परिसरातील नागरिकांना अनुदानावर मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. पेंढरी परिसरात गॅस एजन्सी नाही.
‘ती’ झाडे धाेकादायक
गडचिरोली : जिल्ह्यातील मुख्य रस्त्याच्या बाजूला झुडुपे वाढली आहेत. त्यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. यामुळे अनेक वेळा अपघात घडले असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे झुडुपे तोडण्याची मागणी केली आहे.
डासांचा प्रादुर्भाव
कोरची : शहरातील विविध वॉर्डांत अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजारी लोकांची संख्या वाढत चालली आहे.
सीमावर्ती भाग दुर्लक्षित
सिरोंचा : छत्तीसगड, आंध्र प्रदेश राज्याच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्याच्या चार तालुक्यांतील औद्योगिक विकासाकडे राज्य सरकारचे कायम दुर्लक्ष झाले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत जिल्ह्यात एकही मोठा उद्योग निर्माण न झाल्याने बेरोजगारी वाढली आहे.
सौर ऊर्जेवरील अनेक नळ योजना बंद
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी उपविभागाच्या वतीने ज्या गावात विद्युतची सुविधा नाही, तसेच ग्रामपंचायतीची आर्थिक ऐपत नाही, अशा ग्रा. पं. च्या गावांमध्ये सौर ऊर्जेवरील नळ योजना नाही.