कृषी विभागाने फिरविली वृक्षलागवडीकडे पाठ
By Admin | Updated: December 18, 2014 22:54 IST2014-12-18T22:54:56+5:302014-12-18T22:54:56+5:30
शेतीच्या कामात शेतकऱ्यांना वेळोवेळी सल्ले देऊन शेतकऱ्यांचा मार्गदर्शक म्हणून उपाधी मिळविलेल्या कृषी विभागाने यावर्षी वृक्ष लागवडीकडे सपशेल दुर्लक्ष केले असून जिल्हाभरात ४६ हजार वृक्षांची

कृषी विभागाने फिरविली वृक्षलागवडीकडे पाठ
गडचिरोली : शेतीच्या कामात शेतकऱ्यांना वेळोवेळी सल्ले देऊन शेतकऱ्यांचा मार्गदर्शक म्हणून उपाधी मिळविलेल्या कृषी विभागाने यावर्षी वृक्ष लागवडीकडे सपशेल दुर्लक्ष केले असून जिल्हाभरात ४६ हजार वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट दिले असताना केवळ ३२० वृक्षांची लागवड करून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे.
शेती, उद्योग, वाढत्या लोकसंख्येसाठी राहण्याची व्यवस्था, यामुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली. वृक्षांची संख्या वाढवून पर्यावरण संतुलीत ठेवण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने संपूर्ण राज्यात शतकोटी वृक्ष लागवड ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत वनविभाग, जिल्हा परिषद, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग व वनविकास महामंडळाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी वनविभागाने ५४.६६ टक्के, जिल्हा परिषद १५१.२० टक्के, सामाजिक वनीकरण विभागाने ८२.२६, वनविकास महामंडळाने ४८.१४ व इतर विभागाने २४ टक्के वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यात यश आले आहे.
कृषी विभागाला यावर्षी ४६ हजार ६०० वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी केवळ ३२० वृक्षांची लागवड केली आहे. कृषी विभागाला देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी पूर्ण १ टक्कासुद्धा उद्दिष्ट साध्य करता आले नाही. विशेष म्हणजे याच विभागाला मागील वर्षी २५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी २० हजार ७७३ वृक्षांची लागवड केली होती. उद्दिष्टाच्या जवळपास ८० टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात कृषी विभागाला यश आले होते. कृषी विभागाची ही कामगिरी बघूनच यावर्षी त्यांचे उद्दिष्ट वाढवून ४६ हजार करण्यात आले होते. हे उद्दिष्ट सहज साध्य होईल, असा विश्वास इतर विभागातील अधिकाऱ्यांना असताना कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या योजनेकडे यावर्षी पूर्णपणे पाठ फिरविली. त्यामुळे पावसाळा संपूण आता दोन महिन्याचा कालावधी लोटला आहे. तरी केवळ ३२० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. याचाच अर्थ कृषी विभागाने शतकोटी वृक्ष लागवड योजनेला फारसे गांभीर्याने घेतले नसल्याचे सहज दिसून येते.
कृषीसेवकाकडून शेतकरी वेळोवेळी मार्गदर्शन घेत असल्याने गावातील सर्वच शेतकरी कृषीसेवकाला चांगल्या पद्धतीने ओळखतात. कृषीसेवकाने शेतीविषयक मार्गदर्शन करतानाच पर्यावरणाचेही महत्व समजावून सांगून वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन केले असते तर कृषी विभागाला दिलेले उद्दिष्ट सहज गाठता आले असते. मात्र वृक्ष लागवड करणे हे आपले कामच नसल्याचे ठरविल्याने उद्दिष्ट गाठता आले नाही. विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)