शिक्षकांचे आमरण उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:28 IST2017-11-13T23:28:12+5:302017-11-13T23:28:33+5:30
प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या बदल्या राज्य शासनाच्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार निश्चित झाल्या होत्या.

शिक्षकांचे आमरण उपोषण
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या बदल्या राज्य शासनाच्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार निश्चित झाल्या होत्या. याकरिता दुर्गम भागातील अन्यायग्रस्त शिक्षकांनी अनेकदा निवेदने व पाठपुरावा केला होता. परंतु अन्यायग्रस्त शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाही. दुर्गम भागात कार्यरत शिक्षकांच्या बदल्या कराव्या, या मागणीसाठी दुर्गम भागातील अन्यायग्रस्त शिक्षक संघटनेच्या वतीने बेमूदत आमरण उपोषण १३ नोव्हेंबरपासून गडचिरोली जिल्हा परिषदेसमोर सुरू करण्यात आले.
शासनस्तरावर वारंवार पाठपुरावा करूनही दुर्गम भागातील शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाही. दुर्गम भागातील शिक्षकांना बदल्या करण्याचे केवळ आश्वासन देण्यात आले. परंतु आश्वासनाची पूर्तता झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या दुर्गम भागातील शिक्षकांनी सोमवारपासून बेमुदत आमरण उपोषण जिल्हा परिषदेसमोर सुरू केले. उपोषणाला शिक्षकांसह महिला शिक्षिकाही बसल्या आहेत. शिक्षकांच्या मागण्या मान्य कराव्या, अशी मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम पिपरे, उपाध्यक्ष चक्रपाणि कन्नाके, सुरेश बांबोळे, यशवंत होळी, संजय लोणारे यांनी केली आहे.