लगाम येथील नळ पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 06:00 AM2019-08-31T06:00:00+5:302019-08-31T06:00:34+5:30
लगाम येथील जलशुद्धीकरण केंद्रातून लगाम, लगाम चेक, काकरगट्टा, कांचनपूर, चुटुगुंटा, दामपुर, शांतीग्राम, बोरी आदी गावात पाणी पुरवठा केला जातो. मात्र पाणी पुरवठा योजना सुरू झाल्यापासून दर महिन्याला पाईपलाईन फुटते, संबधित कंत्राटदाराने पाईपलाईन निकृष्ट दर्जाची टाकल्याने नेहमीच ही पाईपलाईन फुटत असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुलचेरा : तालुक्यातील लगाम येथील नळ योजनेची पाईपलाईन फुटल्याने गेल्या आठ दिवसापासून लगाम व लगाम चेक या दोन गावांचा पाणी पुरवठा बंद असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
लगाम येथील जलशुद्धीकरण केंद्रातून लगाम, लगाम चेक, काकरगट्टा, कांचनपूर, चुटुगुंटा, दामपुर, शांतीग्राम, बोरी आदी गावात पाणी पुरवठा केला जातो. मात्र पाणी पुरवठा योजना सुरू झाल्यापासून दर महिन्याला पाईपलाईन फुटते, संबधित कंत्राटदाराने पाईपलाईन निकृष्ट दर्जाची टाकल्याने नेहमीच ही पाईपलाईन फुटत असते. प्रशासनाने संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून सदर बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. लगाम येथे पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी मनुष्य बळाच्या कमतरतेमुळे व कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे महिन्यातून दोन-तीन दिवस तरी नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. मात्र याकडे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.
अहेरी उपविभागाच्या अनेक गावातील सौरऊर्जेवरील नळ पाणीपुरवठा योजना नादुरूस्त स्थितीत असल्याची माहिती आहे.
कामगारांचे मानधन प्रलंबित
लगाम येथील जलशुद्धीकरण केंद्र व पाणी पुरवठा करण्यासाठी सहा कामगारांची नियुक्ती करण्यात आली. मात्र गेल्या चार महिन्यांपासून संबंधित कंत्राटदाराने मानधन अदा न केल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. पगाराअभावी पाईपलाईन दुरुस्तीसाठी त्यांनी अनास्था दाखवली आहे. परिणामी नळ पाईपलाईनची दुरूस्ती रखडली आहे. प्रशासनाने पाणी समस्याची दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.