निवासी शाळेतील विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर

By Admin | Updated: September 16, 2016 01:58 IST2016-09-16T01:58:22+5:302016-09-16T01:58:22+5:30

शाळेत निवासी राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित शाळेतील शिक्षकांची

Survivors of Resident School Students Violence | निवासी शाळेतील विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर

निवासी शाळेतील विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर

इंदारामच्या बालिका विद्यालयातील प्रकार : शिक्षिकेशिवाय विद्यार्थिनी परतल्या खासगी आॅटोने
अहेरी : शाळेत निवासी राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित शाळेतील शिक्षकांची असते. बाहेर स्पर्धा अथवा कार्यक्रम आयोजित केल्यास त्यांना ने-आण करण्याची जबाबदारी संबंधित शाळेची असते. परंतु अहेरी नजीकच्या इंदाराम येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनींच्या क्रीडा स्पर्धा आलापल्ली येथे सुरू असतानाही विद्यार्थिनींना शिक्षिकेशिवाय आॅटोने परतावे लागण्याची वेळ गुरूवारी सकाळी आली. विद्यार्थिनी खासगी आॅटोने शिक्षिकेशिवाय परतल्या. त्यामुळे येथील विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे निष्पन्न झाले आहे.
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या क्रीडा स्पर्धा आलापल्ली येथे सुरू आहेत. या स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी विद्यार्थिनींची दररोज ने-आण केली जात आहे. परंतु ने-आण करताना त्यांच्यासमवेत शाळेतील शिक्षक अथवा शिक्षिका हजर असणे गरजेचे असते. मात्र खेळ संपल्यानंतर विद्यार्थिनींना खासगी आॅटोमध्ये बसवून त्यांची ने-आण सर्रास केली जात आहे. गुरूवारी सकाळी खेळ संपल्यानंतर विद्यार्थिनी इंदाराम येथे आॅटोने परतत असताना लोकमत प्रतिनिधीने याबाबत त्यांची विचारपूस केली असता, शिक्षिका आमच्यासोबत नाहीत. त्या अहेरीतच आहेत, असे सांगितले.
इंदाराम मार्ग अत्यंत दुरवस्थेत असून या मार्गावर नेहमीच अपघात घडत असतात. शिवाय आॅटोमध्ये केवळ विद्यार्थिनीच असल्याने अन्य दुर्घटनाही घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यातच अहेरी-इंदाराम मार्गावर नियमित बससेवा आहे.
गुरूवारी आॅटोच्यासमोरच बस सुटलेली होती. सुरक्षिततेच्या दृष्टीने बसमध्ये विद्यार्थिनींना बसविणे गरजेचे होते. मात्र सुरक्षिततेचा प्रवास सोडून विद्यार्थिनींची आॅटोने ने-आण करण्यात आली. विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी प्रथम मुख्याध्यापिका व शिक्षिकांची असते. परंतु विद्यार्थिनींच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाले. शारीरिक शिक्षिकेची प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती देण्यात आली. परंतु तरीसुद्धा इतर शिक्षिकांवर विद्यार्थिनींना ने-आण करण्याची जबाबदारी देणे गरजेचे होते. (प्रतिनिधी)

विद्यार्थिनींना खेळासाठी ने- आण करण्याची जबाबदारी शारीरिक शिक्षिकेची असते. मी कालच सुटीवरून परतली. त्यामुळे आज घडलेल्या प्रकाराची चौकशी करून संबंधित शिक्षिकेकडून खुलासा मागविला जाईल.
- डी. वाय. ढवस, मुख्याध्यापिका, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, इंदाराम

Web Title: Survivors of Resident School Students Violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.