उन्हाळ्यातही पर्यटकांना खुणावतोय सोमनूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 23:56 IST2019-05-18T23:55:34+5:302019-05-18T23:56:00+5:30
दक्षिणेकडील सिरोंचा तालुका वनवैभवाच्या दृष्टीने उत्यत्तम मानला जातो़ या तालुक्यात सोमनूर हे त्रिवेणी संगमाचे ठिकाण आहे़ सभोवताल विविध प्रजातींच्या वृक्षांनी नटलेला डोंगरदऱ्यातील निसर्गरम्य परिसर आहे. हे पर्यटनासाठी उत्तम ठिकाण असून पर्यटकाचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

उन्हाळ्यातही पर्यटकांना खुणावतोय सोमनूर
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : दक्षिणेकडील सिरोंचा तालुका वनवैभवाच्या दृष्टीने उत्यत्तम मानला जातो़ या तालुक्यात सोमनूर हे त्रिवेणी संगमाचे ठिकाण आहे़ सभोवताल विविध प्रजातींच्या वृक्षांनी नटलेला डोंगरदऱ्यातील निसर्गरम्य परिसर आहे. हे पर्यटनासाठी उत्तम ठिकाण असून पर्यटकाचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
इंद्रावती, गोदावरी व अदृष्य सरस्वती अशा तीन नद्याचा संगामचे पवित्र ठिकाण सोमनूर संगमाला म्हणतात. येथून महाराष्ट्र, छत्तीसगड व आंध्रप्रदेश राज्याची सीमा बघायला मिळते. या दृष्टीने बघितल्यास हे तीन नद्यांच्या संगमासोबतच तीन राज्यांच्या संगमाचेही स्थळ आहे़ सोमनूर येथे संगमाच्या पहाडीवर भगवान शंकराचे मंदिर आहे़ नदीपात्रातसुध्दा शिवलिंग, नदी, नागदेवतांच्या मुर्ती विराजमान आहे. नदीपात्रात लहान मोठे खडक आहेत. त्यावरून पाण्याचा प्रवाह वाहताना खळखळाट करत मधुर नादध्वनी करीत पुढे जातो. येथील पाणी अतिशय नितळ व पारदर्शक आहे़ या पाण्याच्या प्रवाहातील पात्रातील रेती स्पष्ट दिसते़ पाण्याच्या अगदी खाली काही इंचांवर रेती आहे असे वाटते़पण, प्रत्यक्षात ती रेती कित्येक फुट खोल असते़ असे हे अनोखे दृष्टिभ्रम निर्माण करणारे स्थळ आहे़ इंद्रावती नदी पूर्ण दक्षिणेकडे वाहून दक्षिण पश्चिमेकडे वळण घेते. या ठिकाणच्या नदीचे पात्र मोठे आहे. पाणी, वाळू आणि दगडाने भरलेला परिसर असल्याने व नदीचा दोन्ही बाजूला निसर्गरम्य दिसून येते.
पर्यटनदृष्ट्या विकास रखडला
जंगल असल्याने या भागाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यास खुप वाव आहे. या भागाचा विकास झाल्यास तिन्ही राज्याचे पर्यटकांना उच्च कोटीच्या सौंदर्याने नटलेला परिसर पहावयास मिळेल. राज्य शासनाने पर्यटनासाठी येणाऱ्यांना योग्य सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. हजारो भाविक गंगास्नानासाठी येतात. सर्वदूर विस्तीर्ण वनवैभव, विविध प्रजातींच्या पाखरांचा किलबिलाट, विरळ लोकवस्तीमुळे एक अनामिक शांतता हे या स्थळाचे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे पर्यटक आकर्षित होतात.