भामरागडवासीयांचा संघर्ष व वनवास यावर्षीही कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 05:00 AM2020-06-24T05:00:00+5:302020-06-24T05:00:43+5:30
भामरागड-आलापल्ली मार्गावर बांडीया नदी आहे. तसेच गावालगत पर्लकोटा नदी वाहते. पर्लकोटा नदीच्या पुलाचे काम फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार होते. मात्र वन विभागाच्या आडकाठीमुळे हे काम थंडबस्त्यात पडले आहे. त्यातल्या त्या कोरोना संचारबंदीमुळे पुलाच्या कामाला ब्रेक लावला. दोन्ही ठेंगण्या पुलाचा प्रश्न कायम असल्याने याही वर्षी भामरागड तालुक्यातील नागरिकांचे पावसाळ्यात हाल होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : भामरागड तालुका हा नैसर्गिक सौंदर्य व साधनसंपत्तीने औतपोत भरलेला आहे. मात्र पर्लकोटा व बांडीया या दोन्ही नद्यांवर ठेंगणे पूल असल्यामुळे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी पावसाळ्यात शेकडो गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटणार आहे. शिवाय भामरागड शहरासह तालुक्यातील कित्येक घरांमध्ये पाणी शिरून नुकसान होण्याची शक्यता आहे.
भामरागड-आलापल्ली मार्गावर बांडीया नदी आहे. तसेच गावालगत पर्लकोटा नदी वाहते. पर्लकोटा नदीच्या पुलाचे काम फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार होते. मात्र वन विभागाच्या आडकाठीमुळे हे काम थंडबस्त्यात पडले आहे. त्यातल्या त्या कोरोना संचारबंदीमुळे पुलाच्या कामाला ब्रेक लावला. दोन्ही ठेंगण्या पुलाचा प्रश्न कायम असल्याने याही वर्षी भामरागड तालुक्यातील नागरिकांचे पावसाळ्यात हाल होणार आहेत. बांडीया नदीच्या पुरामुळे गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात मृत पावलेल्या इसमाचा मृतदेह गावी पोहोचू शकला नाही. दोन्ही नदीच्या पुलावर पावसाळ्यात पाणी राहते. तसेच नद्या दुथडी भरून वाहत असतात. परिणामी बांडिया नदीच्या पुरामुळे १२८ गावांचा संपर्क तुटतो. तर पर्लकोटा नदीला पूर आल्यानंतर ८० गावांचा जिल्हा मुख्यालय व जगाशी संपर्क तुटतो. त्यामुळे येथे मोठ्या व उंच पुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे व तशी मागणी भामरागड शहरातील नागरिकांनी केली आहे. नागरिकही पुनर्वसनासाठी तयार आहेत. त्यामुळे पुलाचे काम करण्यासाठी शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. या मागणीसाठी नागरिकांनी अनेकदा त्यांना निवेदने दिले आहेत.
तहसीलदारांनी केली पर्लकोटा नदीची पाहणी
तहसील कार्यालय भामरागडच्या वतीने पावसाळ्यातील पूर परिस्थिती व आपत्तीचे व्यवस्थापन करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने भामरागडचे प्रभारी तहसीलदार सत्यनारायण सिलमवार, नायब तहसीलदार प्रकाश पुप्पुलवार यांनी पर्लकोटा नदी व त्यावरील पुलाची पाहणी केली. यावेळी अनमोल कांबळे व महसूल कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांनी सतर्क राहण्यास त्यांनी सांगितले.