वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या कामाचा मुहूर्त काढा
By Admin | Updated: February 25, 2016 01:15 IST2016-02-25T01:15:14+5:302016-02-25T01:15:14+5:30
बहुप्रतीक्षित वडसा-गडचिरोली या रेल्वे मार्गाबाबत सातत्याने प्रत्येक रेल्वे अर्थसंकल्पात चर्चा केली जाते. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरूवात झालेली नाही.

वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या कामाचा मुहूर्त काढा
रेल्वे अर्थसंकल्पाकडून अपेक्षा : वडसा रेल्वेस्थानकावर हवी तिसरी लाईन
गडचिरोली : बहुप्रतीक्षित वडसा-गडचिरोली या रेल्वे मार्गाबाबत सातत्याने प्रत्येक रेल्वे अर्थसंकल्पात चर्चा केली जाते. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे यावर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात या मार्गासाठी भरीव आर्थिक तरतूद होऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात व्हावी, अशी अपेक्षा गडचिरोलीवासीयांनी व्यक्त केली आहे.
वडसा-गडचिरोली हा ५० किमी लांबीचा रेल्वे मार्ग असून या रेल्वे मार्गाची किमत ४०३ कोटी रूपयांवर गेली आहे. आतापर्यंत २८४ कोटी रूपये रक्कम प्राप्त झाली असून १५ किमी जागेचे अधिग्रहण रेल्वे मार्गासाठी करावे लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात राज्य सरकारने आपल्या वाट्याची रक्कम २३४.६८ कोटी रूपये देण्याला मंजुरी दिली. केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात निधीची तरतूद होऊन या रेल्वे मार्गाचे काम यावर्षात सुरू व्हावे, अशी अपेक्षा जिल्ह्यातील जनतेला आहे. देसाईगंज रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणाचे काही काम सध्या सुरू आहे. मागील दोन वर्षांपासून देसाईगंज येथील रेल्वेच्या भूमिगत पुलाचे काम रखडलेल्या स्थितीतच आहे, ते मार्चपर्यंत पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र तशी स्थिती प्रत्यक्षात नाही. वडसा हे गोंदिया ते चांदाफोर्ट या रेल्वे मार्गावरचे महत्त्वाचे स्टेशन आहे. येथे दोन फलाट व दोन रेल्वे लाईन आहे. तिसरी लाईन स्थानक परिसरात टाकण्यात यावी, अशी मागणी अनेक वर्षापासूनची आहे. तसेच वडसा रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांचे ठाणे नाही. साध्या चोरीची तक्रार देण्यासाठी नागभिड रेल्वेस्थानक गाठावे लागते. त्यामुळे येथे रेल्वे पोलिसांची चौकी सुरू करावी, अशीही मागणी आहे. देसाईगंज व गडचिरोली येथील रेल्वे आरक्षण केंद्राच्या वेळा वाढविण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. गडचिरोलीच्या केंद्राची वेळ वाढवावी, अशी मागणी आहे. याशिवाय अहेरी उपविभागातील नागरिकांच्या सोयीसाठी आलापल्ली येथे एक रेल्वे आरक्षीत तिकीट केंद्र सुरू करावे, अशीही मागणी आहे. या भागातील प्रवाशांना बल्लारशहा येथे तिकीटसाठी जावे लागते. (जिल्हा प्रतिनिधी)
आदिवासी बहूल अतिदुर्गम व नक्षलग्रस्त जिल्हा भौगोलिक दृष्ट्या लांबचलांब असल्याने आलापल्ली, सिरोंचा, मुलचेरा या ठिकाणी नवीन तिकीट आरक्षण केंद्र सुरू करावे, पूर्व विदर्भात रेल्वेस्थानक मध्यवर्ती असल्याने साऊथ ईस्ट या मार्गाने धावणाऱ्या गाड्या गोंदिया-वडसा-चंद्रपूर या मार्गाने वळत्या कराव्या, वडसा रेल्वेस्थानकावरील भूमीगत पुलाचे बांधकाम सुरू असले तरी उड्डाण पुलाच्या कामासाठी निधीची तरतूद करावी, वडसा-गडचिरोली या नवीन मार्गाच्या कामाला तत्काळ सुरूवात करावी, वडसा-नागभिड-नागपूर या रेल्वेमार्गाला ब्रॉडगेजमध्ये रूपांतरीत करून त्याचे काम सुरू करावे, वडसा रेल्वेस्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्यावा, महिलांसाठी स्वतंत्र प्रतीक्षालय, आरक्षीत प्रवाशांसाठी प्रतीक्षालय, स्वतंत्र रेल्वे पोलीस स्टेशन, व्हीआयपी रूम आदी अपेक्षा या रेल्वे अर्थसंकल्पातून पूर्ण व्हाव्या.
- डॉ. विष्णू आर. वैरागडे, सदस्य, रेल्वे सल्लागार समिती, देसाईगंज