शिवभक्तांसाठी एसटी सज्ज
By Admin | Updated: February 12, 2015 01:06 IST2015-02-12T01:06:57+5:302015-02-12T01:06:57+5:30
महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यात मार्र्कं डादेव, चपराळा, कालेश्वर, भटाळा, शिरपूर व व्यंकटापूर येथे यात्रा भरते. यात्रेच्या निमित्ताने हजारो शिवभक्त या स्थळांना भेटी देतात.

शिवभक्तांसाठी एसटी सज्ज
लोकमत विशेष
गडचिरोली : महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यात मार्र्कं डादेव, चपराळा, कालेश्वर, भटाळा, शिरपूर व व्यंकटापूर येथे यात्रा भरते. यात्रेच्या निमित्ताने हजारो शिवभक्त या स्थळांना भेटी देतात. शिवभक्तांना यात्रेच्या ठिकाणी पोहोचता यावे, यासाठी एसटी विभागाने आठ दिवसांपूर्वीच नियोजन केले असून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातून सुमारे ११८ बसेस शिवभक्तांसाठी वेगवेगळ्या आगारातून सोडल्या जाणार आहेत.
चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे पुरातन मंदिर आहे. या मंदिराला विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाते. या ठिकाणी दर महाशिवरात्रीला आठ दिवसांची यात्रा भरत असून या यात्रेला विदर्भासह राज्यातील हजारो शिवभक्त येतात. शिवभक्तांना यात्रेच्या ठिकाणी सोडण्याची सेवा करण्याबरोबरच एसटीला उत्पन्नाचे साधनही प्राप्त होत असल्याने एसटी विभागसुद्धा यात्रेच्या निमित्ताने विशेष तयारी करते. जिल्ह्यातील हा सर्वात मोठा पर्व असल्याने आरोग्य, पोलीस विभागही विशेष सतर्क राहतात.
महाशिवरात्रीला १७ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार असली तरी यात्रेकरू मात्र १६ फेब्रुवारीपासूनच जाणार आहेत. त्यादृष्टीने एसटी विभागाने १४ ते २१ फेब्रुवारी दरम्यानचे एसटी बसेसचे नियोजन केले आहे. यात्रांसाठी चंद्रपूर, ब्रह्मपुरी, गडचिरोली, अहेरी, राजुरा, चिमूर व वरोरा आगाराच्या बसेसही मागविण्यात आल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांसोबतच चंद्रपूर जिल्ह्यातीलही नागरिकांसाठी मार्र्कंडादेव येथील यात्रा एक विशेष पर्व मानले जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील यात्रेकरू हरणघाट व साखरीमार्गे येतात. यासाठी मुल येथून विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर साखरी येथे अस्थायी बसस्थानक निर्माण करण्यात आले आहे. चंद्रपूर, ब्रह्मपुरी, राजुरा, वरोरा येथूनही स्वतंत्र बसेस सोडल्या जाणार आहेत.
मार्र्कंडादेव यात्रेबरोबरच चपराळा, तेलंगणातील कालेश्वर येथेही हजारो भाविक महाशिवरात्रीच्या निमित्त जातात. या दोन्ही ठिकाणांना अहेरी आगाराच्या बसेस विशेष सेवा देणार आहेत. यात्रेकरूंची संख्या बघून विशेष बस सोडण्याचेही नियोजन आगाराने केले आहेत. प्रत्येक अस्थायी आगारात यात्रेकरू व एसटी कर्मचाऱ्यांसाठी पाणी भरलेले टँकर उपलब्ध करून दिले जाणार आहे. एकंदरीतच प्रवासादरम्यान यात्रेकरूंची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी विभागाने विशेष खबरदारी घेणार आहे. (नगर प्रतिनिधी)
इतर आगारांकडून मागितल्या बसेस
गडचिरोली आगाराकडे जवळपास ८० बसेस आहेत. यापैकी काही बसेस नियमित मार्गासाठी उपलब्ध करून द्याव्याच लागतात. गडचिरोली आगाराने मार्र्कं डा यात्रेसाठी ३० बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र यादरम्यान प्रवाशांची संख्या जास्त राहत असल्याने एवढ्या बसेसच्या भरवशावर काम चालणे अशक्य असल्याने चंद्रपूर, ब्रह्मपुरी, अहेरी आगारांनाही संबंधित आगारातून बस सोडण्याची विनंती केली आहे. त्यानुसार ब्रह्मपूरी आगारातून १५, चंद्रपूर आगारातून ३०, अहेरी आगारातून १२, राजुरा आगारातून १५, चिमूर आगारातून १० व वरोरा आगारातून ६ बसेस सोडल्या जाणार आहेत.
चोरट्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी मुल, सावली, चामोर्शी, आष्टी, गोंडपिपरी मार्गांवर सुरक्षा पथक कार्यरत ठेवले जाणार आहे. या पथकांकडून नियमितपणे बसेसची तपासणी केली जाऊन विना तिकीट प्रवाशांवर आळा घातला जाणार आहे.