अंगणवाडी कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासून आश्वासनांवर बोळवण
By Admin | Updated: December 11, 2015 01:59 IST2015-12-11T01:59:14+5:302015-12-11T01:59:14+5:30
आपल्या न्याय मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी मागील १० वर्षांपासून सातत्याने मोर्चा,

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासून आश्वासनांवर बोळवण
गडचिरोली : आपल्या न्याय मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी मागील १० वर्षांपासून सातत्याने मोर्चा, धरणे आंदोलन, निवेदन आदींच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केवळ आश्वासने देऊन राज्य शासन बोळवण करीत असल्याची टिका केली जात आहे.
बालकांना पूर्व प्राथमिकचे धडे देण्याबरोबरच गावातील गरोदर मातांना मार्गदर्शन करणे, पोषण आहार पुरविणे, आरोग्याच्या विविध उपक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेण्याचे महत्त्वाचे काम अंगणवाडी सेविका व मदतनीस करतात. संपूर्ण राज्यात एक लाखाहून अधिक अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. बालकांच्या पालन पोषणाची महत्त्वाची जबाबदारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर असली तरी त्यांना वेतनश्रेणी देण्यास शासन चालढकल करीत आहे. केवळ तुटपुंजे मानधन देऊन त्यांना राबविले जात आहे. अनेक वर्ष लढा देऊनही शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शासनाच्या विरोधात संघर्ष तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भामरागड येथे पुष्पा तलांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा पार पडला. या मेळाव्याला प्रा. रमेशचंद्र दहीवडे, सपना रामटेके, वैशाली कोकमुटीवार, नंदा आत्राम, जाणू कड्याम, शारदा मेश्राम, मुन्नी पठाण, संध्या रापर्तीवार आदी उपस्थित होते. अंगणवाडी बाह्य कामांचा बोजा कमी करावा, अशी मागणी करण्यात आली. (नगर प्रतिनिधी)