आत्मा कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा अडचणीत
By Admin | Updated: April 25, 2015 01:33 IST2015-04-25T01:33:17+5:302015-04-25T01:33:17+5:30
कृषी क्रांतीसाठी शासनाने काही वर्षापूर्वी सुरू केलेल्या प्रकल्पाला सेवा देणारे कंत्राटी अधिकारी यांच्यावर ग्रहण लागल्याचे दिसू लागले आहे.

आत्मा कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा अडचणीत
चिमूर : कृषी क्रांतीसाठी शासनाने काही वर्षापूर्वी सुरू केलेल्या प्रकल्पाला सेवा देणारे कंत्राटी अधिकारी यांच्यावर ग्रहण लागल्याचे दिसू लागले आहे. शासनाने या संदर्भात घेतलेला निर्णय मागे न घेतल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा आत्मा एम्पलॉईज वेलफेअर असोशिएशनचे जे. कावळे, जी. जांभूळकर यांनी दिला आहे.
कृषी विद्यापीठे व कृषी संशोधन संस्थाचे तंत्रज्ञान थेट श्ेतकऱ्यांच्या बांध्यावर पोहचविण्याच्या हेतूने २००५ मध्ये राज्याच्या कृषी विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणा करीत सहाय्य (आत्मा), कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा या संस्थेची उभारणी करण्यात आली. या योजनेद्वारे शेतीशाळा, शेतकऱ्यांच्या अभ्यास सहली, कृषी प्रदर्शन, प्रशिक्षणे, पिक फेरपालटाचे प्रयोग, त्याकरिता लागणारा निविष्ठाचा पुरवठा, बाजार पेठ उपलब्धता, शेतकरी उत्पादक कंपनी तयार करणे इत्यादी महत्वपूर्ण बाबी आत्मामधून राबविल्या जातात. त्याकरिता ९० टक्के निधी केंद्राकडून व १० टक्के निधी राज्य शासनाकडून पुरविला जातो.
आत्मा संस्थेत तात्पुरत्या करारतत्वावरील प्रतितालुका एक तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व तीन सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक अशी पदे मंजूर आहेत. सन २०११ पासून ११ महिन्यांच्या कालावधीनंतर एक किंवा दोन दिवसांचा तांत्रिक खंड देऊन व कार्याचे मुल्यमापन करुन परत पुनर्नियुक्ती देण्यात येत होती. परंतु या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या कंत्राटी पद्धतीने करण्याऐवजी बाह्य स्त्रोताद्वारे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय कृषी मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली २८ जानेवारी २०१५ रोजी कृषी आयुक्तालयात घेण्यात आला आहे. राज्यातील सुमारे ३५३ तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व १०५९ सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक व ३३ संगणक अज्ञावली रुपरेखक यांना याचा फटका बसणार आहे. आत्मा एम्पलॉईज वेलफेअर असोशिएशनने मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री, कृषी आयुक्त यांना वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत. (तालुका प्रतिनिधी)