सोमनूर पर्यटनस्थळ उपेक्षितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:09 IST2021-02-06T05:09:11+5:302021-02-06T05:09:11+5:30
आसरअल्लीतील भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत सिरोंचा : तालुक्यातील आसरअल्ली परिसरात सात ते आठ गावांचा समावेश आहे. परंतु या भागातील बीएसएनएल ...

सोमनूर पर्यटनस्थळ उपेक्षितच
आसरअल्लीतील भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत
सिरोंचा : तालुक्यातील आसरअल्ली परिसरात सात ते आठ गावांचा समावेश आहे. परंतु या भागातील बीएसएनएल कव्हरेज व इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. अंकिसा परिसरातील लक्ष्मीदेवीपेठा, बालमुत्त्यमपल्ली, कंबालपेठा, राघवरावनगर, जंगलपल्ली, गेर्रेपल्ली आदी गावे येतात.
तलाव सौंदर्यीकरणाचा प्रश्न थंडबस्त्यात
गडचिरोली : गोकुलनगरलगतच्या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी प्रशासनाच्यावतीने हाती घेण्यात आले होते. मात्र सौंदर्यीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाले नाही. तलाव सौंदर्यीकरणाचा प्रश्न थंडबस्त्यात असल्याचे दिसून येत आहे.
धानोरा येथे औद्योगिक वसाहतीचे काम रखडले
धानोरा : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या धानोरा तालुका मुख्यालयात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. मात्र याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे औद्योगिक वसाहतीचे काम थंडबस्त्यात पडले आहे.
अनेक प्रशासकीय इमारती जीर्णावस्थेत
अहेरी : अहेरी तालुका मुख्यालयातील अनेक प्रशासकीय इमारती जीर्णावस्थेत आल्या आहेत. तरीही याच इमारतींमधून प्रशासकीय कारभार चालविला जात आहे. मात्र अद्यापही नवीन इमारत बांधण्यात आलेल्या नाहीत.
प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी कागदोपत्रीच
गडचिरोली : शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदीचे आदेश जारी केले आहेत. परंतु ही बंदी केवळ कागदावरच दिसून येत आहे. ५० मायक्रॉन जाडीपेक्षा कमी व ८ ते १२ इंच उंचीपेक्षा लहान आकाराची प्लास्टिक पिशवी वापरणे व उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. संबंधितांवर कारवाई करावी.
गणपूरच्या हनुमान मंदिरात सुविधांचा अभाव
आरमोरी : तालुक्याच्या वडधा परिसरातील गणपूर येथील हनुमान मंदिर देवस्थान विकासापासून वंचित आहे. येथील मंदिराचा विकास साधावा, अशी मागणी परिसरातील भाविकांनी केली आहे. वडधापासून तीन किमी अंतरावर असलेल्या गणपूर येथे जंगल परिसरात हनुमान मंदिर वसले आहे. वर्षभर भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. येथे हातपंप नसल्याने भाविकांना विहिरीचे पाणी काढावे लागते. त्याचबरोबर अन्य सोयी-सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या भागातील भाविकांनी केली आहे.
रोजगारासाठी मजुरांचे छत्तीसगडमध्ये स्थलांतर
गडचिरोली : ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांना काम मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूर कामासाठी छत्तीसगड व तेलंगणा राज्यात स्थलांतर करीत आहेत. सदर मजूर तेंदुपत्ता तोडण्याचा हंगाम सुरू होईपर्यंत परतणार नाहीत. गोदावरी नदीवर पूल झाल्याने तेलंगणात स्थलांतरित होणाऱ्या मजुरांची संख्या वाढली आहे.
दुर्गम गावांतील रस्ते खड्डेमय
भामरागड : तालुका मुख्यालयापासून १८ किमी अंतरावरील लाहेरी गावाकडे येणारा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला आहे. हिंदेवाडा ते लाहेरी या मार्गाची दुरवस्थाही अनेक दिवसांपासून झाली आहे. परंतु या मार्गाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. गडचिरोलीवरून अहेरीमार्गे येणारी बस अनेकदा पंक्चर झाली. गडचिरोलीकडे जाणारी बस उशिरा गेल्याने या भागाची शाळकरी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नेहमी बस पंक्चर होत असते. परंतु रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.
बांधकाम साहित्यांमुळे रहदारीस अडथळा
धानोरा : ग्रामपंचायत धानोरा शहरातील विविध भागात घराचे बांधकाम सुरू असून, बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवत आहेत. लोखंडी सळ्या तोडण्याचे कामही रस्त्यावरच करण्यात येते. त्यामुळे अडथळा निर्माण झाला आहे.
छुप्या पद्धतीने विजेची चोरी सुरूच
गडचिरोली : महावितरणचे बहुतांश कर्मचारी घरूनच कारभार हाकत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याचा फटका महावितरणला बसत आहे. त्यामुळे महावितरणने लक्ष देण्याची मागणी सूज्ञ ग्राहकांकडून होत आहे.
वैयक्तिक शौचालयांची गावांत कमतरता
एटापल्ली : अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली आदी दुर्गम तालुक्यातील अनेक गावांमध्ये वैयक्तिक शौचालये फारच कमी प्रमाणात आहेत. जिल्ह्यात १०० टक्के शौचालये असणारे एकही गाव नाही. यामुळे गोदरीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे आजारात वाढ होत आहे. ग्रामीण नागरिक मुख्य रस्त्यावरच शौचास बसतात.
पशुखाद्यांच्या किमतीत भरघोस वाढ
देसाईगंज : दुभत्या व कष्टाचे काम करणाऱ्या जनावरांना सरकी, ढेप, कडधान्यांचा कोंडा चारला जातो. यामुळे जनावरे सुदृढ राहून दूध जास्त देतात. वाढत्या महागाईचा फटका पशुखाद्यांनाही बसला आहे. पशुखाद्यांच्या किमती जवळपास १० टक्क्याने वाढल्या आहेत.
रायगट्टा पुलावर कठडे उभारण्याची मागणी
अहेरी : तालुक्यातील रायगट्टा पुलावर कठडे उभारण्यात आले नाहीत. हा पूल कमी उंचीचा व अरूंद आहे. कठडे नसल्याने वाहन पुलाच्या खाली कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो.
टिकेपल्लीतील शिवमंदिर दुर्लक्षित
अहेरी : अहेरी व मुलचेरा या दोन तालुक्यांच्या सीमावर्ती भागात निसर्गरम्य वातावरणात शिवमंदिर आहे. प्राणहिता नदीच्या काठावर असलेल्या टिकेपल्ली येथील शिव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त शेकडो भाविकांची गर्दी उसळते. मात्र या परिसरात प्रशासन सोयी-सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. टिकेपल्ली येथे मागील २७ वर्षांपासून महाशिवरात्रीनिमित्त जत्रेचे आयोजन करण्यात येत आहे. दरवर्षी या ठिकाणी भाविकांची संख्या वाढतच चालली आहे. मात्र प्रशासनाकडून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. त्यामुळे सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी होत आहे.
रांगी परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित
धानोरा : तालुक्यातील रांगी, निमगाव, निमनवाडा, बोरी परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या उन्हाची तीव्रता अधिक वाढत असल्याने वातानुकूलित यंत्रसामग्रीसाठी विजेची आवश्यकता असते; परंतु वीज वारंवार गायब होत असल्याने नागरिक उकाड्यामुळे त्रस्त आहेत.
रोमपल्ली मार्गाची दुरवस्था कायम
झिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर ते रोमपल्ली या २७ किमी मार्गाच्या डांबरीकरणासाठी निधी मंजूर झाला. निधीदर्शक फलकही बांधकाम विभागाने लावले आहेत. परंतु या मार्गाच्या डांबरीकरणासाठी दिरंगाई होत आहे. परिणामी या मार्गाने ये-जा करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
तालुक्यातील झिंगानूर ते सिरकोंडापर्यंतचे अंतर १७ किमी आहे. या रस्त्याचेसुद्धा डांबरीकरण करण्यात आले नाही. झिंगानूर ते रोमपल्ली हे अंतर २५ किमी आहे. या भागात आदिवासी बांधव बहुसंख्येने आहेत. परंतु या गावांमध्ये जाण्यासाठी पक्का रस्ता नाही.
अंगणवाडीस्तरावर दक्षता गट स्थापन करा
देसाईगंज : महिला व मुलांवर होणाऱ्या अत्याचार व गैरकृत्य, हुंडाबळी, विनयभंग आदी प्रकरणांना गावपातळीवर आळा घालण्याकरिता अंगणवाडी स्तरावर दक्षता गट स्थापन करावे, अशी मागणी आहे.
ठाणेगावातील डासांचा बंदोबस्त करा
आरमोरी : ठाणेगावातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. पाण्याचा योग्यप्रकारे निचरा होत नसल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे गावात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. डासांमुळे रोगराई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.