परिचालकांच्या समस्या सोडवा
By Admin | Updated: December 16, 2014 22:53 IST2014-12-16T22:53:47+5:302014-12-16T22:53:47+5:30
शासनाच्या ग्राम विकास व जलसंधारण भागाने १९ एप्रिल २०११ रोजी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये संग्राम कक्षाची स्थापना करण्यात आली. या संग्राम कक्षामध्ये

परिचालकांच्या समस्या सोडवा
गडचिरोली : शासनाच्या ग्राम विकास व जलसंधारण भागाने १९ एप्रिल २०११ रोजी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये संग्राम कक्षाची स्थापना करण्यात आली. या संग्राम कक्षामध्ये मानधन तत्वावर संगणक परिचालकांची नियुक्तीही करण्यात आली. मात्र अल्पश: वेतनावर संगणक परिचालकांकडून काम करवून घेतले जात आहे. त्यामुळे संगणक परिचालकांचे मानधन न वाढविल्यास कामबंद आंदोलन केले जाईल, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांच्यामार्फत देण्यात आलेल्या निवेदनातून संघटनेने दिला आहे.
शासन निर्णयानुसार संगणक परिचालकांना दरमहा ८ हजार रूपये मानधन देण्याचे निश्चित देण्यात आले. प्रत्यक्ष मानधन देतांना पदवीधर नसलेल्यांना ३ हजार ५०० तर पदवीधारकांना ३ हजार ८०० रूपये अदा केले जाते. संगणक परिचालकांना शासकीय सेवेत कायम करावे, २००० प्रमाणे वाढीव भत्ता देण्यात यावा, दरमहा ८ हजार वेतन देण्यात यावे, दर महिन्यात देण्यात येणाऱ्या ४५० एंट्री रद्द कराव्यात, महिला संगणक परिचालकांना प्रसुती रजा वाढवून देण्यात याव्या, तसेच प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये नेट कनेक्टीव्हीटीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार मानधन वाढविण्याची मागणी परिचालकांच्यावतीने करण्यात आली. मात्र शासन स्तरावर अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संगणक परिचालकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. संगणक परिचालकांना शासन सेवेत कायम न केल्यास त्याबरोबर दरमहा ८ हजार रूपये मानधन न दिल्यास बेमुदत कामबंद आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे. (शहर प्रतिनिधी)