चपराळा अभयारण्यात सहा गावांचे पुनवर्सन रखडले
By Admin | Updated: March 6, 2015 01:29 IST2015-03-06T01:29:04+5:302015-03-06T01:29:04+5:30
गडचिरोली जिल्ह्यात भामरागड व चपराळा हे दोन अभयारण्य आहेत. शासनाने १९८६ मध्ये चपराळा हे वन्यजीव अभयारण्य घोषीत केले.

चपराळा अभयारण्यात सहा गावांचे पुनवर्सन रखडले
आष्टी : गडचिरोली जिल्ह्यात भामरागड व चपराळा हे दोन अभयारण्य आहेत. शासनाने १९८६ मध्ये चपराळा हे वन्यजीव अभयारण्य घोषीत केले. या अभयारण्यात चौडमपल्ली, चपराळा, सिंगनपल्ली, धन्नूर, चंदनखेडी, मार्र्कंडा (क) ही सहा गावे समाविष्ट आहेत. मात्र या सहा गावांचे अजूनपर्यंत पूनर्वसन न झाल्याने या अभयारण्यातील वाघांचे अस्तित्व नाहीसे झालेले आहे. यामुळे या अभयारण्यात येणाऱ्या या गावांचे पुनर्वसन करण्यासाठी लोकप्रतिनिधी व शासनाचे पुढाकार घेण्याची गरज आहे.
चपराळा अभयारण्याची सिमा ही आष्टी पेट्रोलपंपाच्यापुढील वळणावर असलेल्या वनविभागाच्या चौकीपासून सुरू होऊन लगाम नाक्यापर्यंत व नागुलवाही गावाची सिमेपासून तर रेंगेवाहीपर्यंत एकुण १३४.७८ चौ. किमी पर्यंत पसरलेली आहे. या अभयारण्यात असलेल्या सहा गावातील जवळपास ५ हजार जनावरे या अभयारण्यात चरतात. शिवाय या गावातील नागरिकांचे जाणे-येणे, रहदारी तसेच अवैध शिकारी यामुळे जंगलातील वन्यप्राण्यांचे प्रमाण कमी झालेले आहे. २००३ पर्यंत या अभयारण्यात १० वाघ अस्तित्वात होते. तेव्हापासून अभयारण्यातील गावांचा पूनर्वसनाचा प्रश्न रखडलेला आहे.
चपराळा अभयारण्यातील चौडमपल्ली येथील १३० नागरिकांनी व सिंगनपल्ली येथील ५० नागरिकांनी स्वइच्छेने पुनर्वसनासाठी नावे देऊन तयारी दर्शविलेली आहे. शासनाच्या योजनेनुसार पुनर्वसनासाठी १८ वर्षावरील मुलाला प्रत्येकी १० लाख रूपये शासनाकडून मिळणार आहे. एका कुटुंबामध्ये जितके सदस्य असतील त्यानुसार त्यांना मोबदला मिळणार आहे. (प्रतिनिधी)