श्रावणमासात धार्मिक ग्रंथांचे पारायण
By Admin | Updated: August 29, 2016 02:15 IST2016-08-29T02:15:33+5:302016-08-29T02:15:33+5:30
आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील डोंगरावरील महादेवाच्या मंदिरात तसेच कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे

श्रावणमासात धार्मिक ग्रंथांचे पारायण
कढोलीत ५० वर्षांची परंपरा : पांडव प्रताप, हरिविजय, श्रीराम विजयचे वाचन; महादेव गडावरही कार्यक्रम
आरमोरी/ कुरखेडा : आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील डोंगरावरील महादेवाच्या मंदिरात तसेच कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे श्रावण महिन्यानिमित्त पुराणाचे वाचन करण्यात येत आहे. सदर पुराण ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी उसळत आहे.
पळसगाव येथील महादेवगडावर पुराणाचे वाचन मारोतराव दोनाडकर महाराज करीत आहेत. पुराण वाचनाची सुरूवात ३ आॅगस्टपासून झाली आहे. मारोतराव दोनाडकर महाराज यांच्यासोबतच माणिक कोसरे, टिकाराम मोहुर्ले, सखाराम नखाते, केशव उरकुडे, आत्मराम नाकतोडे, मनोहर राऊत, रघू दुपारे, सुखाजी चव्हारे, आसाराम धनबाते, रामदास कोल्हे, टिकाराम ढोरे, बळीराम राऊत, मंगरू सोनुले, रामजी मानकर, कवडूजी मातोरे, हेमचंद ढोरे, लक्ष्मण नाकाडे आदी उपस्थित राहून पुराण वाचनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो. महादेवगडावरील मंदिरात शिवलिंग आहे. श्रावण महिन्यातील दर सोमवारी मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. डोंगरावर निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या मंदिरात भाविकांची गर्दी श्रावण महिन्यात आणखी वाढते. पुराण वाचनाच्या कार्यक्रमाचा समारोप श्रावण महिन्यानंतर केला जाणार आहे.
कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे धार्मिक ग्रंथाचे पारायण करण्याची परंपरा ५० वर्षांची आहे. श्रावण मास म्हणजे सणाचा महिना दीपपूजा म्हणजेच गुरूपौर्णिमेपासून प्रारंभ झालेल्या श्रावण महिन्याची समाप्ती पिठोली अमावश्या म्हणजेच पोळ्याच्या पाडव्याला होते. यादरम्यान गावागावांत धार्मिक वातावरण असते. कढोली येथे ही परंपरा ५० वर्षांपासून सुरू आहे. या महिन्यात पांडव प्रताप, हरिविजय, रामायण यासारख्या धार्मिक ग्रंथाचे वाचन केले जाते. कढोली येथील स्व. काशिनाथ आकरे हे धार्मिक वृत्तीचे गृहस्थ श्रावण मासाची सुरूवात झाली होती. आपल्या घरी धार्मिक ग्रंथाचे पारायण करीत. काम, क्रोध, मोह, माया, मत्सर या वाईट विचारांचा त्याग करून सन्मार्गाने जगण्याचा मंत्र देणाऱ्या ग्रंथाचे पठण ऐकण्यासाठी गावातील अनेक लोक गोळा होत. एकंदर या महिन्यात धार्मिक वातावरण असायचे. काशिनाथ आकरे यांनी मृत्यूनंतर या धार्मिक ग्रंथाच्या पारायणाची जबाबदारी कढोली येथील प्रतिष्ठीत व्यापारी लक्ष्मण नंदनवार यांच्यावर सोपविली. मागील २० वर्षांपासून ते धार्मिक ग्रंथाचे पारायण करीत आहेत. धार्मिक ग्रंथ माणसाला सन्मार्गाने जीवन जगण्याचा मंत्र देतात, असे लक्ष्मण नंदनवार आवर्जून सर्वांना सांगतात. (शहर प्रतिनिधी)