वजनांचे पासिंग करण्यात दुकानदार आघाडीवर
By Admin | Updated: May 6, 2015 01:41 IST2015-05-06T01:41:23+5:302015-05-06T01:41:23+5:30
ज्या काट्यावर ग्राहकाला माल वजन करून दिला जातो. यामध्ये दुकानदारांकडून कोणतीही हातचलाखी केली जाऊ नये, ...

वजनांचे पासिंग करण्यात दुकानदार आघाडीवर
गडचिरोली : ज्या काट्यावर ग्राहकाला माल वजन करून दिला जातो. यामध्ये दुकानदारांकडून कोणतीही हातचलाखी केली जाऊ नये, यासाठी वर्षभरातून एकदा वैधमापन शास्त्र विभागाच्यामार्फतीने काट्याचे पासिंग करून घेऊन रितसर प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. इतर जिल्ह्यात ५० टक्केही काटे पासिंग होत नसताना गडचिरोली जिल्ह्यात मात्र हे प्रमाण १०० टक्के आहे. यावरून येथील दुकानदार व ग्राहक जागृक असल्याचे दिसून येत आहे. २०१४-१५ या वर्षात सुमारे तीन हजार ७१२ वजन काट्यांचे पासिंग झाले आहे.
माल खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक होऊ नये, यासाठी दुकानातील प्रत्येक काटा पासिंग करणे बंधनकारक आहे. यासाठी शासनाने वैधमापन शास्त्र विभागाची स्वतंत्र निर्मिती केली आहे. या विभागाच्यामार्फतीने मोठे गाव व शहरांमध्ये एका निश्चित कालावधीनंतर काटे पासिंग शिबिरांचे आयोजन करण्यात येते. पासिंगदरम्यान दुकानदारांकडून आलेल्या वजनांचे वजन योग्य आहे काय, याची तपासणी करून तपासणी योग्य असल्यास सदर वजनावर संबंधित वर्ष टाकल्या जातो. त्यानंतर सदर वजन वैध समजल्या जाते.
गडचिरोली जिल्ह्यात अशा प्रकारचे एकूण एक हजार ९२६ वजन काटे आहेत. हे सर्व वजन काटे २०१४-१५ मध्ये पासिंग करण्यात आले आहेत, अशी माहिती सहाय्यक नियंत्रक वैधमापनशास्त्र चंद्रपूर, गडचिरोलीच्या कार्यालयाने दिली आहे.
बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर इलेक्ट्रॉनिक काट्यांचाही वापर वाढला आहे. बहुतांश दुकानदार याच काट्यांचा वापर करतात. याही काट्यात फेराफेरी करणे शक्य असल्याने या काट्यांचेही पासिंग दरवर्षी करून प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुमारे एक हजार ७८६ इलेक्ट्रॉनिक काटे असून या सर्व काट्यांचे २०१४-१५ मध्ये पासिंग झाले आहे. याचा अर्थ गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच काटे पासिंग आहेत.
अलिकडचा ग्राहक जागृक झाला आहे. त्यामुळे दुकानदारही विशेष सावधगीरी बाळगत दरवर्षी काट्यांचे पासिंग करून घेतले जात आहेत. साध्या वजन काट्यांच्या तुलनेत इलेक्ट्रानिक काट्यांमध्ये हेराफेरी करणे कठिण असले तरी ही हेराफेरी सहजासहजी दिसून पडत नाही. त्यामुळे या काट्यांबाबत वैधमापन शास्त्राचे अधिकारी विशेष जागृक असल्याचे दिसून येते.
इतर जिल्ह्यांमध्ये वैधमापन शास्त्र विभागाकडे असलेल्या नोंदीच्या तुलनेत अर्धेही काटे दरवर्षी पासिंगसाठी येत नाही. त्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यातील काटे पासिंग समाधानकारकच मानावी लागेल. मात्र दुर्गम भागातील दुकानदार खुलेआमपणे पासिंग न करताच काटे वापरत आहेत, हे सत्यही नाकारता येत नाही. (नगर प्रतिनिधी)