अमिर्झा परिसरातील अनेक हातपंप नादुरूस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:52 IST2021-02-05T08:52:47+5:302021-02-05T08:52:47+5:30

बामणीच्या प्रवासी निवाऱ्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष सिरोंचा : तालुक्यातील बामणी येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाली आहे. प्रवाशांना त्रास होत ...

Several hand pumps in the Amirza area malfunctioned | अमिर्झा परिसरातील अनेक हातपंप नादुरूस्त

अमिर्झा परिसरातील अनेक हातपंप नादुरूस्त

बामणीच्या प्रवासी निवाऱ्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष

सिरोंचा : तालुक्यातील बामणी येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाली आहे. प्रवाशांना त्रास होत असल्याने प्रवासी निवाऱ्याच्या दुरूस्तीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील प्रवाशांकडून होत आहे. बामणी येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाली असल्याने प्रवासी निवारा कधीही कोसळू शकतो. त्यामुळे प्रवाशांना उन्ह, वारा, पावसात उभे राहावे लागते.

टाकाऊ पदार्थांमुळे नदीतील पाणी दूषित

आरमोरी : शहरातील अनेक नागरिक नदीपात्रात निर्माल्य तसेच टाकाऊ पदार्थ नेऊन टाकतात. त्यामुळे नदीचे प्रदूषण होण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. गडचिरोली जिल्ह्यातून वैैनगंगा नदी वाहते. या नदीच्या किनाऱ्यावर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो पाणीपुरवठा योजना बसल्या आहेत. या पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून लाखों नागरिक वैैनगंगा नदीचे पाणी पितात.

गोकुलनगरात पोलीस चौकीची मागणी

गडचिरोली : स्थानिक गोकुलनगरात चोरी व गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे येथे पोलीस चौकी निर्माण करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्रीही नगरात वाढली आहे. त्यामुळे या अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलीस चौकी उभारण्याची मागणी होत आहे.

पळस वृक्षाची तोड वाढली

धानोरा : गडचिरोली जिल्ह्यात पळस वृक्षाची अनेक झाडे आहेत. या झाडांच्या पानापासून पत्रावळी तयार केले जातात. सालीमध्ये औषधी गुण आहे. पळसाच्या झाडावर लाखेचे उत्पादनही घेतले जाते. एकंदरीतच पळसाचे झाड बहुगुणी आहे. मात्र या झाडाचे तोड वाढली आहे.

एमआयडीसीतील अनेक भूखंड रिकामे

गडचिरोली : गडचिरोली शहराजवळची शेकडो एकर जागा आहे. एमआयडीसीसाठी राखीव करण्यात आली आहे. या परिसरात पाणी, वीज यासारख्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र बहुतांश भूखंड रिकामेच आहेत.

जयरामपूर परिसरातील मनोऱ्यांची रेंज वाढवा

आष्टी : जयरामपूर परिसरातील भ्रमणध्वनी सेवा मागील अनेक दिवसांपासून विस्कळीत होत असल्याने या भागातील विविध कंपनीच्या भ्रमणध्वनी ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे भ्रमणध्वनी मनोऱ्यांची रेंज वाढवावी, अशी मागणी परिसरातील ग्राहकांनी केली आहे.

चव्हेला-रानवाही मार्ग खडीकरणाच्या प्रतीक्षेत

धानोरा : तालुक्यातील छत्तीसगड सीमेलगत असलेल्या चव्हेला ग्रामपंचायतमधील रानवाही या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही. चव्हेला-रानवाही या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असल्याने या भागातील वाहनधारक व प्रवाशांची प्रचंड पंचाईत होत आहे.

अनेक महाविद्यालये स्थायी प्राचार्यविना

वैरागड : चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठांतर्गत दोन्ही जिल्हे मिळून २५० पेक्षा अधिक महाविद्यालये आहेत. यापैकी १०० वर महाविद्यालयात स्थायी प्राचार्य नसून येथे कार्यकारी प्राचार्य असल्याची माहिती आहे. गेल्या दोन वर्षापासून स्थायी प्राचार्याविनाच या महाविद्यालयाचा कारभार सुरू आहे.

नकली बिल देणाऱ्यांवर कारवाई करा

गडचिरोली : जिल्हाभरातील काही दुकानदार नकली बिल देऊन ग्राहक व शासनाची फसवणूक करीत आहेत. नकली बिल देणाऱ्या दुकानदारांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा ग्राहक जनजागृती संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

झिंगानूर येथे विद्युत उपकेंद्र निर्माण करा

झिंगानूर : झिंगानूर येथे विद्युत उपकेंद्र निर्माण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. झिंगानूर परिसरात झिंगानूर चेक नं. १, चेक नं. २, झिंगानूर माल, येडसिली, वडदेली, बाबुपेठटोला, लिंगापूरटोला, मंगीगुडम, कर्जेली, रमेशगुडम, किष्टय्यापल्ली, कोर्ला, पुल्लीगुडम, कोपेला व अन्य गावांचा समावेश आहे. झिंगानूरपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या बामणी येथून वीजपुरवठा या परिसरात केला जात आहे. दूरवरून वीजपुरवठा होत असल्याने परिसरातील वीजपुरवठा अनेकदा खंडित होतो. या समस्येची सोडवणूक होण्याकरिता येथे विद्युत उपकेंद्र निर्माण करणे गरजेचे आहे.

आरोग्य उपकेंद्रातील प्रसूतीगृहात सुविधा पुरवा

आरमोरी : जिल्ह्यातील ३७६ आरोग्य केंद्रांपैकी ३५४ उपकेंद्रांमध्ये प्रसूतीगृह बांधण्यात आले आहेत. मात्र सदर प्रसूतीगृह अत्यंत लहान असून या प्रसूतीगृहांमध्ये आवश्यक असलेल्या सोयीसुविधांचा अभाव असल्याने गरोदर मातांना प्रचंड यातना सहन कराव्या लागत आहेत.

महागाईतही निराधारांना तोकडे अनुदान

कुरखेडा : निराधारांना शासनाकडून प्रतिमहा अत्यल्प अनुदान दिले जाते. सदर अनुदान अत्यंत कमी आहे. महागाईमुळे प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनुदानात वाढ करण्यात यावी, अशी मागणी अनेकदा करण्यात येऊनही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. महागाई वाढत असल्याने अनुदान तुटपुंजे ठरत आहे.

बेरोजगारांना दुकान गाळे देण्याची मागणी

गडचिरोली : मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत दुकान गाळे बांधण्यात आले. यातील काही दुकान गाळे भाडे तत्त्वावर देण्यात आले आहे. उर्वरित गाळे रिकामीच आहेत. जिल्हा प्रशासनाने वाजवी दरात येथील दुकान गाळे बेरोजगारांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Several hand pumps in the Amirza area malfunctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.