आपत्ती नियंत्रणासाठी सात हजार सदस्यांची टीम

By Admin | Updated: June 5, 2015 01:31 IST2015-06-05T01:30:28+5:302015-06-05T01:31:06+5:30

पुराबरोबरच इतर नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तीच्यावेळी नागरिकांना वेळेवर मदत मिळावी व कमीतकमी हानी व्हावी, यासाठी जिल्हा ते ग्रामस्तरापर्यंत..

Seven thousand members of the team to control disaster | आपत्ती नियंत्रणासाठी सात हजार सदस्यांची टीम

आपत्ती नियंत्रणासाठी सात हजार सदस्यांची टीम

गडचिरोली : पुराबरोबरच इतर नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तीच्यावेळी नागरिकांना वेळेवर मदत मिळावी व कमीतकमी हानी व्हावी, यासाठी जिल्हा ते ग्रामस्तरापर्यंत सुमारे सात हजार सदस्यांची टीम तयार करण्यात आली आहे. या सदस्यांना प्रशिक्षकांच्या माध्यमातून प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात नद्यांची संख्या जास्त आहे. या नद्यांना संजय सरोवर, पुजारी टोला, गोसेखुर्द, इटीयाडोह धरणाचे पाणी सोडले जाते. याचा फटका जिल्ह्यातील सुमारे ४२ गावांना बसतो. कित्येक गावांचा पावसाळ्याच्या दरम्यान संपर्क तुटला राहतो. त्यामुळे या गाववासीयांना वेळेवर प्रशासनाची मदत न मिळाल्यास जनजीवन विस्कळीत होऊन जीवितहानी होण्याची शक्यता राहते. जिल्ह्यात सर्वाधिक नैसर्गिक आपत्ती पुरामुळे निर्माण होत असल्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पावसाळ्याच्या दिवसात विशेष सतर्क राहते.
पुराबरोबरच आग, वीज, भूकंप, चक्रीवादळ, साथरोग, दुष्काळ, सर्पदंश, चेंगराचेंगरी आदी घटना घडल्यासही त्या परिसरातील आपत्ती यंत्रणेचे सदस्य तत्काळ घटनास्थळी पोहोचून मदत करतील. यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. गावपातळीवर ही जबाबदारी प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवक व तलाठ्यांकडे देण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी रणजीतकुमार असून सहअध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी आहेत.
आपत्ती व्यवस्थापनाचे काम पाहण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून सुनंदा पडोळे यांची नेमणूक करण्यात आली आहे. या तीन मुख्य अधिकाऱ्यांसोबतच उपविभागीय अधिकारी व तहसीलदार तालुकास्तरावर आपत्ती व्यवस्थापनाचे काम पाहण्यास मदत करीत आहेत. (नगर प्रतिनिधी)
चार सर्च लाईटची खरेदी
पूर, भूकंप, आग यासारख्या आपत्तीदरम्यान सर्च लाईट अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा प्रकारची आपत्ती आल्यास वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे बचाव पथकाला काम करताना फार मोठी अडचण होते. यावर सर्च लाईट अत्यंत फायदेशीर ठरतात. सर्च लाईटचा प्रकाश एक किलोमीटरच्या परिसरात पसरत असल्याने बचाव पथकाला आपले काम करता येते. ही बाब लक्षात घेऊन यावर्षी आणखी चार सर्च लाईट खरेदी करण्यात आले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे आता सध्या आठ सर्च लाईट आहेत.
आठ प्रकारचे पथक
नैसर्गिक किंवा मानव निर्मित आपत्ती निर्माण झाल्यास शोध व बचाव पथक, प्रथमोपचार पथक, शालेय सुरक्षा पथक, कार्यालयीन कर्मचारी पथक, पत्रकारांचे पथक, स्वयंसेवकांचे पथक, स्वयंसेवी संस्थांचे पथक व पंचायतराज पथक नेमण्यात आले आहे. प्रत्येक पथकामध्ये जवळपास ५० सदस्यांचा समावेश आहे. प्रत्येक पथकातील सदस्याला योग्य प्रशिक्षण देण्यात आले आहे.
आपत्ती निवारणासाठी असलेली यंत्रसामुग्री
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे सद्यस्थितीत ७२ फायर एक्सटिंविशर, सहा रबर पॉवर बोट, २९ लाईफ सुरक्षा रिंग, ५५ लाईफ जॅकेट, १८ जनरेटर, आठ सर्च लाईट, १२ प्रथमोपचार पेट्या व १० वायरलेस ही यंत्रसामुग्री उपलब्ध आहे. याशिवाय गडचिरोली तालुक्यातील राजगट्टा, धानोरा तालुक्यातील भेंडीकरणार व अहेरी येथे वीज अटकाव यंत्रणा उभारली आहे. ४० ठिकाणी पर्जन्यमापन यंत्रणा बसविली आहे.
या गावांना बसतो पुराचा फटका
पुराचा फटका बसत असलेल्या गावांमध्ये शिवणी, कृपाळा, गोविंदपूर, येल्ला, गोमणी, मार्र्कं डादेव, कळमगाव, आष्टी, अनकोडा, वघाळा, शिवणी (बु), सायगाव, डोंगरगाव, वैरागड, विसोरा, सावंगी, अरततोंडी, किन्हाळा, कुरखेडा तालुक्यातील कुरखेडा, मोहगाव, सायटोला, कुंभीटोला, मालेवाडा, बांधगाव, अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली, गडअहेरी, बामणी, चिंचगुंडी, दामरंचा, एटापल्ली तालुक्यातील हिंदूर, इक्केर, झारेवाडा, सिरोंचा तालुका मुदृकृष्णापूर, मोयाबीन पेठा, दर्शेवाडा, अंकिसा यांचा समावेश आहे.

Web Title: Seven thousand members of the team to control disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.