सुरक्षा कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:09 IST2021-02-06T05:09:14+5:302021-02-06T05:09:14+5:30
गडचिरोली : गावात क्षुल्लक कारणावरून तंटे निर्माण होऊ नये, झालेच तर ते गावपातळीवरच मिटवून गावात शांतता, व्यसनमुक्ती व्हावी, ...

सुरक्षा कुचकामी
गडचिरोली : गावात क्षुल्लक कारणावरून तंटे निर्माण होऊ नये, झालेच तर ते गावपातळीवरच मिटवून गावात शांतता, व्यसनमुक्ती व्हावी, यासाठी तंमुसची स्थापना करण्यात आली. तंमुसचा कारभार चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी सदस्यांना प्रशिक्षण द्यावे.
जननी सुरक्षा कुचकामी
आलापल्ली : शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही. आरोग्य केंद्रस्तरावर याबाबत प्रचंड दिरंगाई होत आहे.
पांढरे पट्टे विरहित दिसतात गतिरोधक
आष्टी : वाहनचालकांना रस्त्यावरील गतिरोधक दिसावे, यासाठी गतिरोधकावर पांढरे पट्टे मारले जातात. मात्र बहुतांश गतिरोधकांवर पट्टे दिसत नाही. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. अनेक अवजड वाहनधारक वेगाने जातात.
ग्रामीण भागात वीज चोरीच्या प्रमाणात वाढ
देसाईगंज : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीज चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने वीज महामंडळाचे लाखो रुपयाचे नुकसान होत आहे. मात्र वीज चोरीचा भुर्दंड इतर नागरिकांना सहन करावा लागताे.
एटापल्लीत किरकाेळ चाेरीचे प्रमाण वाढले
एटापल्ली : थंडीची चाहूल लागताच एटापल्लीत चोरीचे प्रमाण वाढले आहे. दररोज लहान-लहान चोऱ्या हाेत आहेत. एटापल्ली येथील पंचायत समिती आवारातील बचत गट कार्यालयात वारंवार चाेऱ्या हाेत असून येथील गॅस सिलिंडर चाेरट्यांनी लपास केले.
सौरदिवे धूळखात
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये सौरदिवे बसविण्यात आले आहेत. मात्र या सौरदिव्यांची देखभाल व दुरूस्ती केली जात नसल्याने ९० टक्के सौरदिवे बंद पडले आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होताच गावात अंधाराचे साम्राज्य पसरते.
निवाऱ्यांची दुरवस्था
गडचिरोली : येथून आरमोरीकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या मोहझरी, वसा, देऊळगाव येथील प्रवाशी निवाऱ्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. प्रवाशी निवाऱ्याच्या देखभाल दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रवाशी निवाऱ्याचे बांधकाम करताना त्याच्या दुरूस्तीची जबाबदारी निश्चित करावी.
पुलाची उंची वाढवा
धानोरा : तालुक्यातील कारवाफा नाल्यावरील पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत अनेकदा सदर मार्ग बंद राहत असल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
फवारणी करा
कुरखेडा : रामगड- पुराडा भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या भागात तत्काळ डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यंदाच्या पावसाळ्यातही फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागले.
स्वच्छतागृहाचा अभाव
धानोरा : चातगाव येथील बसथांब्यावर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने त्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे चातगाव बसस्थांब्यावर स्वच्छतागृहाची निर्मिती करावी, अशी मागणी आहे. चातगाव हे धानाेरा मार्गावर असून येथे शेकडाे नागरिक दरराेज आवागमन करीत असतात.
नाल्यांचा उपसा करा
गडचिरोली : आरमोरी मार्गावरील नाल्या मागील अनेक दिवसांपासून उपसण्यात आल्या नाही. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. या मार्गावर व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर कचरा नाल्यांमध्ये फेकत असतात. त्यामुळे नाल्या लवकरच तुंबतात. कारवाई करण्याची मागणी आहे.
शाळांची दुरूस्ती करा
सिरोंचा : तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक शाळांच्या इमारतींना ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. या शाळांच्या इमारती जीर्णावस्थेत पोहोचल्या आहेत. या इमारतींचे निर्लेखन करून नवीन इमारत बांधण्याची मागणी आहे. सिराेंचा तालुक्याच्या दुर्गम भागात शाळांच्या इमारती खराब आहेत.
शिव मंदिर जीर्णावस्थेत
गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिव मंदिर आहे. सदर मंदिर हेमाडपंथी आहे. अमिर्झापासून चार किमी अंतरावर असलेल्या या मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सदर मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. सदर मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते.