‘त्या’ २२ जणांची झाली गुप्त सभा
By Admin | Updated: May 5, 2016 00:08 IST2016-05-05T00:08:41+5:302016-05-05T00:08:41+5:30
१५ एप्रिल रोजी शंकरपूर-चोप मार्गावर झालेल्या अपघातातील ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या एकूण २२ जणांची अज्ञातस्थळी गोपनीय बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

‘त्या’ २२ जणांची झाली गुप्त सभा
ट्रॅक्टर अपघात प्रकरण : तडजोडीसाठी रकमेची केली मागणी
देसाईगंज : १५ एप्रिल रोजी शंकरपूर-चोप मार्गावर झालेल्या अपघातातील ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या एकूण २२ जणांची अज्ञातस्थळी गोपनीय बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याप्रकरणातील खऱ्या रहस्याची माहिती परिसरातील नागरिकांना झाली असल्याने पोलीस आपल्याला कधीही अटक करू शकतात, त्यामुळे पोलिसांशी तडजोड करण्यासाठी या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांनी प्रत्येकाकडून सात हजार रूपये वसूल करण्याचा प्रस्ताव सर्वांसमोर ठेवला. शिवाय या बैठकीच्या चर्चेबाबत कुठे वाच्चता केल्यास बघून घेण्याची धमकीसुद्धा मुख्य सूत्रधाराने बैठकीत २१ जणांना दिली.
सदर ट्रॅक्टर अपघाताप्रकरणी यातील २१ जणांनापैकी एकाने जरी गडबड केल्यास व मला अटक झाल्यास सर्वांनाच या प्रकरणात पोलिसांमार्फत अडकविणार, अशी तंबी मुख्य सूत्रधाराने सभेत सर्वांना दिली. १५ एप्रिल रोजी शंकरपूर-चोप मार्गावर झालेल्या अपघातग्रस्त ट्रॅक्टरमध्ये एकूण २२ जण बसले होते, अशी माहिती आता पुढे आली आहे. यापैकी ३ मे रोजी चार जणांना पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावून कसून चौकशी केल्याची माहिती आहे. १५ एप्रिल रोजी ट्रॅक्टर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात उमाकांत बांबोळे व विजय आत्राम यांचा जागीच मृत्यू झाला, असे भासविण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी तळाशी जाऊन तपास न करता मृतदेहाचे शव विच्छेदन केले. त्यानंतर चोप, कोरेगाव, शंकरपूर परिसरात वेगळीच चर्चा सुरू झाली. अपघातानंतर उमाकांत बांबोळे याचा घटनास्थळी मृत्यू झाला तर मागे बसलेला विजय आत्राम गंभीर जखमी झाला. दरम्यान अपघाताची माहिती होऊ नये म्हणून तीन ते चार जणांनी आत्राम याला फावडे, सबल व लाठी काठ्यांनी ठार मारल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मृतक बांबोळेच्या साहित्याच्या रकमेच्या वाटपातून काहींना हिस्सा न मिळाल्याने या प्रकरणातील खरे रहस्य पुढे येत असल्याचे दिसते. (वार्ताहर)