ग्रामीण भागात सट्टापट्टी जाेरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:33 IST2021-04-19T04:33:45+5:302021-04-19T04:33:45+5:30
देसाईगंज : तालुक्यासह जिल्हाभरातील शहरी भागात सट्टापट्टीचे नंबर पाहण्यासाठी मोबाईलद्वारे इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. अनेक लोक भ्रमणध्वनीवर इंटरनेटद्वारे ...

ग्रामीण भागात सट्टापट्टी जाेरात
देसाईगंज : तालुक्यासह जिल्हाभरातील शहरी भागात सट्टापट्टीचे नंबर पाहण्यासाठी मोबाईलद्वारे इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. अनेक लोक भ्रमणध्वनीवर इंटरनेटद्वारे सट्टापट्टीचे नंबर शोधताना दिसून येतात. मात्र, याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
कुटुंब नियोजनाबाबत जनजागृतीचा अभाव
गडचिरोली : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कुटुंब नियोजनात महिला आघाडीवर आहेत. पुरुषांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.
रिक्त पदांमुळे कामाचा ताण वाढला
भामरागड : तालुक्यातील अनेक विभागांत रिक्त पदे असल्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. एकाच कामासाठी १५-१५ दिवस शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागत असल्याने नागरिकांमध्ये शासनाप्रति तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. तसेच कर्मचारी कमी असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे.
ग्रामीण भागात वीजचोरीचे प्रमाण वाढले
मुलचेरा : महावितरणचे बहुतांश कर्मचारी घरूनच कारभार हाकत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याचा फटका महावितरणला बसत आहे. त्यामुळे महावितरणने लक्ष देण्याची मागणी सुज्ञ ग्राहकांकडून होत आहे. मुलचेरा तालुक्याच्या ग्रामीण भागात वीजचोरीचे प्रमाण अधिक आहे.
कार्यालयीन कामकाज कागदांवरच सुरू
गडचिरोली : दिवसेंदिवस शासकीय कार्यालयांमधील फाईलची संख्या वाढत चालली आहे. जिल्हा परिषदसह अनेक कार्यालयांमध्ये या फाईल ठेवण्यासाठी जागा नाही. मागे फाईलचा गट्टा व समोर कर्मचारी खुर्ची लावून बसले आहेत. दस्तावेजांच्या जतनासाठी स्वतंत्र खोलीची गरज आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.
धोकादायक इमारती पाडण्याची मागणी
गडचिरोली : जिल्ह्यातील २६१ शाळांमधील जवळपास ४०० च्यावर वर्गखाेल्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. सदर इमारती जीर्ण झाल्या असल्याने या वर्गखोल्यांचे निर्लेखन करणे आवश्यक आहे. मात्र, निर्लेखनाची अवस्था अत्यंत किचकट आहे. त्यामुळे इमारतींचे निर्लेखन रखडले आहे.
गोगाव-पिपरटोला मार्गाची दुरुस्ती करा
गडचिरोली : तालुक्यातील गोगाव-पिपरटोला या मार्गाची अनेक दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सदर मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी गोगाव, पिपरटोला येथील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
चामोर्शीतील मोकाट डुकरांचा बंदोबस्त करा
चामोर्शी : शहरात मागील काही दिवसांपासून मोकाट डुकरांची संख्या भरपूर प्रमाणात वाढली आहे. कचरा तसेच सांडपाण्याच्या डबक्यांमध्ये मोकाट डुकरे बसून असतात. त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. या डुकरांपासून बालकांना धोका आहे. त्यामुळे मोकाट डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आरमोरी तालुक्यातील गावांना लाईनमनच नाही
आरमोरी : तालुक्यातील अनेक गावांत राईसमिल, आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपाना विद्युत पुरवठा करावा लागतो. परंतु, अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. तसेच एकाकडे अनेक गावांचा प्रभार आहे.
भामरागड तालुक्यातील पर्यटनस्थळ दुर्लक्षित
भामरागड : गडचिरोली जिल्हा हा निसर्गाच्या विविध उधळणीने नटलेला आहे. या ठिकाणी शेकडो पर्यटनस्थळे आहेत. भामरागड तालुक्यातील बिनागुंडासह अन्य पर्यटनस्थळाचा विकास अजूनपर्यंत झालेला नाही. त्यामुळे या स्थळांचा विकास करण्याची गरज आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
रस्त्याच्या बाजूची झाडे ठरताहेत धोकादायक
गडचिरोली : जिल्ह्यातील मुख्य रस्त्याच्या बाजूला झुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. यामुळे अनेकवेळा अपघात घडले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे झुडुप तोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. चामोर्शी व आरमोरी मार्गावर काटेरी झुडपे वाढली आहेत.
जिल्ह्यात रोजगाराभिमुख तंत्रशिक्षणाचा बट्ट्याबोळ
आरमोरी : कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शासनाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था व इतर तंत्रशिक्षण संस्था निर्माण केल्या असल्या तरी, यातील अभ्यासक्रम पूर्णपणे कालबाह्य झाले आहे. त्याचबरोबर यातील अनेक पदे रिक्त आहेत.
शेकडो नागरिक अस्थमा आजाराने ग्रस्त
गडचिरोली : प्रदूषण, धुळीचे कण, धूम्रपान व अनुवांशिक कारणांमुळे उद्भवणारा अस्थमा आजार जीवघेणा ठरू शकतो. मागील एका वर्षात सहा रुग्णांना या आजारामुळे प्राणास मुकावे लागले होते. दिवसेंदिवस अस्थमा रोगाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे.
रायगट्टा पुलावर कठडे लावण्याकडे दुर्लक्ष
अहेरी : तालुक्यातील रायगट्टानजीक पुलावर कठडे नसल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. सदर पूल कमी उंचीचा असल्याने पुलावरून पावसाळ्यात नेहमीच पाणी असते. परिणामी अनेकदा वाहतूक ठप्प होते. त्यामुळे पुलावर कठडे लावण्याची आवश्यकता आहे.
जिल्हा परिषदेत दिव्यांगांची ससेहोलपट
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या इमारतीत लिफ्टची व्यवस्था करण्यात यावी, असा प्रस्ताव चार वर्षांपूर्वी मांडण्यात आला. मात्र, सदर प्रस्तावावर पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या इमारतीत लिफ्ट बसविण्यात आली नाही. त्यामुळे वृध्द व अपंग नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
विमा नसलेल्या वाहनांवर कारवाईच नाही
भामरागड : कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास वाव असतो. मात्र वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाहन खरेदी सुरू असल्याने रस्त्यावर लाखो वाहने विम्याशिवाय धावत आहेत. प्रशासन कारवाईबाबत सुस्त आहे.
विद्युत तारांवरील फांद्यांची कटई करा
अहेरी : रस्त्याच्या बाजूने विजेचे खांब आहेत. रस्त्याच्या बाजूला झाडेसुद्धा आहेत. झाडाच्या फांद्या विद्युत तारांवर आल्याने विद्युत पुरवठा खंडित होण्याचा धोका असतो. त्याचबरोेबर एखादी दुर्घटनासुद्धा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्युत तारांवरील फांद्या तोडण्याची मागणी होत आहे.
टाकीत साचतेय अशुद्ध पाणी
गडचिरोली : शुद्ध व पुरेसा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शहरात पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु, या टाकीच्या सुरक्षेसाठी पालिका प्रशासन गंभीर नसल्याने या टाकीच्या परिसरात घाण साचून राहत आहे.
उघड्यावरील खाद्यपदार्थांकडे दुर्लक्ष
आरमाेरी : अनेक तालुका मुख्यालयाच्या उपाहारगृह व हॉटेलमध्ये उघड्यावर खाद्यपदार्थाची विक्री होत आहे. यामुळे परिसरात विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
वयोवृध्दांना तीन हजार रुपये पेन्शन द्या
कमलापूर : जिल्ह्यात वयोवृध्द ओबीसी शेतकरी व शेतमजुरांची संख्या मोठी असून त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी ओबीसी प्रवर्गातील शेतकरी, शेतमजुरांना वयाच्या ६० वर्षांनंतर प्रतिमहिना तीन हजार रुपये वृध्दापकालीन अर्थसहाय्य पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
चतुर्थश्रेणी दर्जापासून कोतवाल वंचित
वैरागड : गावात दवंडी देणे, मृतदेहाची विल्हेवाट लावणे, शेतसारा जमा करणे अशी विविध कामे करणाऱ्या जिल्हाभरातील सज्जाअंतर्गत कोतवालांना महिन्याकाठी अल्प मानधन दिले जात आहे. वारंवार मागणी करूनही कोतवालांना चतुर्थश्रेणी दर्जा देण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे.
शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा पुरवा
देसाईगंज : ऑनलाईन सातबारा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा तलाठी कार्यालयामार्फत पुरवावा, अशी मागणी होत आहे. हस्तलिखित सातबारे बंद केल्याने शेतकऱ्यांना सेतू केंद्राचे हेलपाटे मारावे लागत आहेत. यात त्यांची आर्थिक लूट केली जात आहे.
रेगडी-कसनसूर मार्गाची ठिकठिकाणी दुरवस्था
घोट : रेगडी- कसनसूर मार्गाची दुरवस्था झाली असून या मार्गावरील पुलानजीक मोठे खड्डे पडल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. मात्र, रस्ता व पुलावरील खड्डा बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. खड्ड्यांमुळे या मार्गावर किरकाेळ अपघात वाढले आहेत. भविष्यात गंभीर अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर कारवाई करा
काेरची : कर्मचाऱ्यांनी शासकीय कार्यालयाच्या वेळेवर येणे गरजेचे असतानाही बहुतांश कर्मचारी ११ वाजल्याशिवाय येतच नाहीत. त्यामुळे कारवाई करावी. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिक येऊन अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करीत असतात. तालुक्याच्या अतिदुर्गम व ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना कामाशिवाय परतावे लागते. त्यामुळे आर्थिक भूर्दंडसुद्धा साेसावा लागताे.